पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पोलिसांना लेखी अगोदरच कळविले होते ,असे असताना हि त्यानंतर झालेल्या जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे त्यांचे राजकीय खच्चीकरण करणे नाही काय ? असा शंकास्पद सवाल आता राजकीय वर्तुळात आणि त्यांच्या समर्थकांतून आणि चाहत्यांमधून एकीकडे विचारला जातो आहे तर दुसरीकडे आज खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मानकर यांची जाहीर पणे बाजू घेतली आहे
अजित पवार म्हणाले, दीपक मानकर यांचा जितेंद्र जगताप या व्यक्तीच्या आत्महत्येशी थेट संबध दिसत नाही. उलट मानकर यांनी त्याला व्यवसायात सहकार्य केले होते, अशी आपली माहिती आहे. शिवाय जगताप यांच्याकडून आत्महत्या करण्याची धमकी त्यांना देण्यात येत असल्याची माहिती देणारा अर्ज मानकर यांनी पुणे पोलिसांना दिला होता.मुळशी तालुका राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित भुकूम येथील मेळाव्यात अजित पवार यांनी हे वक्तव्य केले .
शनिवारी दुपारी जितेंद्र जगताप यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी पाठविलेल्या चिठ्ठीत त्यांनी दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व इतर व्यक्ती कारणीभूत असल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी जगताप यांचा मुलगा जयेश जगताप याने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेवक दीपक मानकर, सुधीर कर्नाटकी व सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील पाच जणांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.
तथापि मानकर यांनी एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारीच पोलिसांकडे ,जगताप हे आत्महत्येची धमकी देत असल्याचा लेखी तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला होता . पहा या अर्जाच्या फोटो कॉपी ….
जर मानकर यांनी अगोदरच लेखी कळविले होते तर … त्यांचा दोष कसा काय ? असा सवाल केला जातो आहे .
दरम्यान जितेंद्र जगताप हे जरी मानकर यांच्याजवळचे होते तरी जगताप यांच्याही राजकीय महत्वाकांक्षा होत्या. यापूर्वी महापालिकेच्या निवडणुका त्यांनी लढविल्या आहेत. यावेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक होते.
दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे शहरातील खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाते ,तसे ते मराठा,बहुजन समाजाचे नेते म्हणूनही सुपरिचित आहेत .त्यांचे नाव येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर होते.खुद्द खासदार वंदना चव्हाण यांनी नुकतेच जाहीरपणे मानकर यांचे कौतुक हि केले होते. १० जून च्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरु केली होती .आगामी कोथरूड विधानसभाच नाही तर पुणे लोकसभेसाठी खंबीर उमेदवार म्हणून त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहू लागले होते .कोथरूडच्या शिवसृष्टीसाठी त्यांनी अनेकदा तीव्र आंदोलनाचा आवाज उठविला होता.
दरम्यान आत्महत्या केलेले जगताप यांच्या नातलगांनी दुरचित्रवाहिन्यांना दिलेल्या बाईट वरून देखील मानकर यांच्या कडून काही रकमेची त्यांना अपेक्षा होती असे सांगितले आहे . माध्यमांमधून आलेल्या बातम्यांनुसार आत्महत्येची चिठ्ठी कशी मिळाली? आत्म् हत्येपुर्वी अशा प्रकारे,अशा मार्गाने चिठ्ठी पाठविणे ,असे प्रकार सहसा दिसत नाहीत . या मुळे गूढता दिसत असल्याने मानकर यांना गोवले जाते आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . मानकर यांच्या राजकीय उत्कर्षाच्या काळात त्यांच्यावर ओढविलेल्या या प्रसंगाने त्याचे राजकीय खच्चीकरण होऊ शकेल असी समीक्षकांचे म्हणणे आहे .