पुणे
”आजूबाजूंच्या व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण करणे हेच अभिनय करणाऱ्या कलाकारांचे सर्वात महत्वाचे काम असते. कारण अभिनय कसा करावा ते शिकविता येता नाही. भावनाशील अभिनय हा मुळात आतूनच यावा लागतो. माझ्या दृष्टीने माझा प्रत्येक चित्रपट हा नवा अनुभव असतो” असे मत ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले. गुरुवारपासून सुरु झालेल्या तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पिफ विशेष गौरव सन्मान २०१५’ प्रदान करण्यात आला त्यानिमित्त आज (शुक्रवारी) पत्रकारांशी वार्तालाप करताना अभिनेत्री तनुजा मुखर्जी यांनी सांगितले की, अभिनय हा कधीच बदलत नसतो. बदलत असते ते सादरीकरण. कारण अभिनय हा मुळातच यावा लागतो. चित्रपटसृष्टीत काम करताना ‘कैमेऱ्यालाच मी मित्र मानले त्यामुळे मी यशस्वी अभिनेत्री होऊ शकले. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.
आपल्या चुलबुल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि अभिनयाचे ‘समर्थ’ घराणे लाभलेल्या तनुजा मुखर्जी म्हणाल्या की माझे घराणे जरी पहिल्यापासून चित्रपटसृष्टीत होते तरी माझ्या कारकिर्दीला त्याची फार मोठी मदत झाली असे मुळीच नाही कारण मी आधी माझे शिक्षण पूर्ण करावे असा माझ्या आईचा आग्रह होता. मला मराठीसह, गुजराती, बंगाली, मल्याळम, इंग्रजी आदी अनेक भाषा येतात हे त्याचेच एक कारण आहे असेही त्यांनी सांगितले. मी माझ्या भूमिका पारखूनच स्वीकारल्या आणि दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणेच भूमिका केल्या असे सांगून त्यांनी आपण मधुबाला, मीनाकुमारी यांच्या सारख्या अभिनेत्रींचे चाहते होते तसेच दिलीपकुमार, किशोरकुमार यांच्यासारखे अलौकिक अभिनेते हे आपले आदर्श होते असे सांगितले. आपली कन्या असलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री काजोल ही देखील अतिशय ‘समर्थ’ अभिनेत्री असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चित्रपट हे प्रामुख्याने मनोरंजनाचे साधन असले तरी जो चित्रपट सामाजिक संदेश देतो तो मी चांगला मानते असे सांगून तनुजा मुखर्जी पुढे म्हणाल्या की कालच्या आणि आजच्या चित्रपटसृष्टीत फारसा काही फरक आहे असे मला वाटत नाही बदल घडला आहे तो फक्त तंत्रज्ञानातील फरकांमुळे. मात्र हा बदल खूप चकित करणारा आहे असेही त्यांनी सांगितले. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये कोणत्याही समस्यांवर तोडगा सांगितला जात नाही त्यामुळे माझ्या दृष्टीने त्या मालिकां निरर्थक आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.