पुणे-मोदी लाटेत शहरत आठ हि जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आणि महापालिकेत स्पष्ट बहुमत देखील भाजपला मिळाल्यावर आता यापुढे अवसान गेलेल्या पक्षांप्रमाणे गलितगात्र अवस्था प्राप्त करून न घेता चैतन्य निर्माण करण्याची गरज कॉंग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी मधून व्यक्त होते आहे .
भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील आणि स्थानिक पातळीवरील सत्तेमुळे या पक्षातील अनेकांना बराचसा फरक जाणवतो आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना ज्याप्रमाणे विरोधी पक्षांना वागणूक मिळत असे, तशी वागणूक भाजप सत्तेवर असताना मिळत नाही , याला कारण,’ कधी तरी मिळाले ..अन गटकन ..गिळाले ‘.. अशी भाजपा अवस्था सांगितली जाते आहे. शहरातील एक बडा बिल्डर हैराण झालेला असताना ,कधी काळचा त्याचा प्रतिस्पर्धी असलेला दुसरा बिल्डर भाजपला मदत करूनही समाधानी नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. भाजपला केवळ ..हवेच आहे .. घ्यायचे माहिती आहे… द्यायचे माहिती नाही .. अशी स्पष्ट अवस्था राजकीय वर्तुळातून सांगितली जाते आहे. आणि त्यात स्पष्ट बहुमत .. यामुळे प्रसंगी प्रतिस्पर्ध्याला संपविण्याचे राजकारण देखील करू पाहत असल्याचा आरोप होतो आहे. या परिस्थितीत प्रत्येक नेत्याची पावले सावध पडत होती . भुजबळांच्या अवस्थे नंतर ….. आता कॉंग्रेसचे नारायण राणे भाजपच्या वाटेवर का आहेत ? याबाबत हि शंका घेतली जाते आहे. सत्तेचा असा वापर भाजप करीत असल्याचा आरोप अनेकवेळा ‘राजकीय सूड ‘या शब्दाने झाला. पण आता नोटबंदी नंतर बरीचसी परिस्थिती निवळली आहे .’ भेळ तिथे खेळ ‘ करणारे खेळ खेळून बसले आहेत . त्यानंतर प्रत्येकाला आपापले स्थैर्य हवे आहे . या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहर अध्यक्ष विनायक निम्हण यांनी राणेंच्या कृतीवर लक्ष ठेवत स्वपक्षाला सोडण्याची तयारी ठेवली असल्याने; निम्हण हवेच, पण गेलेच तर ,त्यांच्या जागेवर चंद्रकांत मोकाटे यांच्या सारख्या तरुणाईचा शोधही सेनेने सुरु ठेवला आहे.
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या गोटात जरी अंतर्गत खेचाखेची असली तरी राष्ट्रवादी मात्र सजग होऊ पाहते आहे असे चित्र आहे . माजी महापौर असलेल्या वंदना चव्हाण या खासदार आहेत.पण शहर अध्यक्ष म्हणून कार्यकर्ता आणि त्यांचा समूह सांभाळण्याची त्यांची क्षमता दिसून येत नाही ,केवळ मुठ्भरांच्या हितासाठी त्या झटतात असा त्यांच्यावर नेहमी आरोप होत आला आहे. कात्रजचे स्वर्गीय अजित बाबर यांचे त्यांचे खटके उडाले होते. तसे सध्याही पक्षाच्या डॅशिंग असलेल्या नेत्यांबरोबर त्यांचे फारसे सख्य दिसून येत नाही. त्या त्यांच्या पुरत्याच व्यवस्थित अशीच त्यांची व्याख्या केली जाते. आणि दुसरीकडे पक्षांतर्गत विरोध असतानाही कॉंग्रेसचे अध्यक्षपद रमेश बागवे कशी प्रत्येक वेळी आक्रमक चाल करीत आहेत याकडे लक्ष वेधले जावू लागले आहे.महापालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे नगरसेवक भाजपच्या ९८ नगरसेवकांना पुरून उरत आहेत . पण बाहेर शहर पक्ष पातळीवर मात्र याबाबत केवळ कॉंग्रेस च रमेश बागवे यांच्या सारख्या अध्यक्षांमुळे आघाडीवर दिसत आहे.
या सर्व बाबींचा अभ्यास करून खुद्द शरद पवार यांनीच आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावरून चव्हाण यांना सन्मानाने पायउतार करावे अशी मागणी होते आहे. लढवय्या असलेला आणि कार्यकर्त्यांची ताकद बाळगणारा कोणताही नेता अध्यक्ष करा अशी मागणी होते आहे. पण असा नेता कोण ? असा प्रश्न केला तर केवळ दीपक मानकर यांचेच नाव पुढे येते आहे . खुद्द याबाबत मानकर किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजिबात चर्चा देखील नाही हे विशेष मानकर यांचे नाव त्यांच्या स्वतःच्या वर्तुळा बाहेरून पुढे येते आहे. कॉंग्रेसचे रमेश बागवे आणि दीपक मानकर यांच्या जोडगळीनेच तत्कालीन शहराचे नेते सुरेश कलमाडींची ताकद वाढविली होती याकडे लक्ष वेधण्यात येत आहे . कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने या दोघांच्या मदतीने शहरात ताकद वाढविली तर गोगावले-बापट यांच्या भाजपला ते जोरदार टक्कर देतील असे मानले जाते आहे .
प्रत्यक्षात आता शहर भाजप मध्ये मात्र वेगळीच परिस्थिती आहे. खेचाखेचीत सुहास कुलकर्णी,उजवल केसकर सारखे हिरे गळून पडले तर विकास मठकरीसारखे निष्प्रभ ठरले आहेत. संदीप खर्डेकर यांच्या सारखे आंदोलक ही जणू स्वतः पुरतेच एकाकी पडल्याचे चित्र आहे. अशा पक्षातील डॅशिंग कार्यकर्त्यांचा पक्षात असूनही पक्षासाठी उपयोग करवून घेतला जात नाही असे दिसते आहे .खासदार शिरोळे स्वतःत अडकून पडले आहेत तर दुसरे खासदार लढाईत मागे पडत आहेत. एकंदरीत शहर आणि महापालिका भाजपच्या गोटात पायापुरते मर्यादित विचार यामुळे शहर राजकारणावर स्थानिक पकड न रहाता थेट मुंबईतूनच सूत्रे हलवावी लागत आहेत असे सध्याचे चित्र आहे पण तेच जबरदस्त असल्याचाही दावा करण्यात येतो असला तरीही यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाला शहर पातळीवर मोठी किंमत मोजावी लागेल असे चित्र आहे . या सर्व राजकीय गदारोळात कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेने सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आतापासूनच शहरातील सर्वोच्च अस्तित्वासाठी योग्य मोहरे पुढे करून व्यूहरचना करावी लागणार आहे .
–शरद लोणकर, पुणे