पुणे:स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता हे भारतीय गुरु -शिष्य परंपरेचे श्रेष्ठ प्रतिक होते, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज केले.‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभाग’ च्या वतीने ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ पुस्तक संचाचेे प्रकाशन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले.
स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या भगिनी निवेदिता यांच्या ऑक्टोबर 2017 पासून 150 व्या जयंती वर्षास प्रारंभ झाला आहे, त्यानिमित्त या पुस्तक संचातील चार पुस्तकांचे प्रकाशन केंद्राच्या वतीने करण्यात आले.व्यासपीठावर महापौर मुक्ता टिळक, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष पद्मश्री निवेदिता भिडे ,अभय बापट,सुधीर जोगळेकर, प्रकाश पाठक, डॉ.सुरुची पांडे, मृणालिनी चितळे, आदिती जोगळेकर हर्डीकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘ गुरूची आचारसंहिता स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहून कळते, तसेच शिष्य कसा असावा हे भगिनी निवेदिता यांच्या समर्पित व्यक्तीमत्वाकडे पाहून कळते. या देशात बाहेरुन आल्यावर त्या देशाशी , देशाच्या मूल्यांशी एकरुप झाल्या. स्वातंत्र्यलढयातील त्यांच्या सहभागापासून शिक्षण, कला विचारापर्यंत निवेदिता यांचे पैलू एकमेवाद्वितिय आहेत.त्यांच्या राष्ट्र विचाराची ज्योत प्रत्येकाच्या हदयाला भिडून पुढे काम करण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.विवेकानंद केंद्राच्या निवेदिता भिडे तसेच लेखिका मृणालिनी चितळे,सुरुची पांडे, आदिती जोगळेकर -हर्डीकर यांनी मनोगत व्यक्,केले
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या ,’भगिनी निवेदिता यांचे कार्य प्रेरणादायक होते . त्यांचे विचार पुस्तकरूपात येत आहेत ही महत्वपूर्ण बाब आहे ‘शनिवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे हा प्रकाशन सोहळा झाला,प्रकाशित झालेल्या चार पुस्तकांमध्ये ‘भारतीय मूल्यविचार’ : डॉ. सुरूचि पांडे, ‘शिक्षण विचार’: डॉ. स्वर्णलता भिशीकर, ‘स्वातंत्र्यलढा-सहभाग आणि चिंतन’ : प्रा.मृणालिनी चितळे, ‘कला आणि राष्ट्रविचार’ : आदिती जोगळेकर-हर्डीकर यांचा समावेश आहे. 800 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तक संचाचे मूल्य 700 रुपये आहे.