पुणे– सध्या एखादी माहिती जलद गतीने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. सोशल मिडीयाचा सक्रीयतेने वापर करणाऱ्या व्यक्तींनी समाजाच्या हितासाठी या माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन पुण्याचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने स. प. महाविद्यालय येथे आयोजित सोशल मिडीया महामित्र उपक्रमांतर्गत संवाद सत्र कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री.गलांडे बोलत होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्प संचालक आरती डोळस, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक अनुपमा पवार, महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग,माहिती अधिकारी वृषाली पाटील, प्राध्यापक उमेश चौधरी अनिल मोहिते, मुकुंद माने, शैलेंद्र ठकार आदि उपस्थित होते.
श्री. गलांडे म्हणाले, जे माध्यम शिकण्यासाठी कुठलेच प्रशिक्षण वर्ग नाहीत असे माध्यम म्हणजेच सोशल मिडीया. या माध्यमाचे चांगले व वाईट परिणाम आपल्याला दिसून येतात. आपल्या मोबाईलवरील कोणताही संदेश नाहीसा करता येत नाही, हे ध्यानात घेऊन समाज माध्यमांचा वापर सामाजिक जाणिवेतून सकारात्मकपणे करावा. घरातील व्यक्तींचा मोबाईल एकमेकांनी हाताळतांना जेव्हा भिती राहणार नाही आणि कोणीही कोणाचाही मोबाईल सहजपणे वापरु शकेल, तेव्हा खऱ्या अर्थाने समाज माध्यमांचा सकारात्मक उपयोग होईल. पूर्वी एखाद्या संदेश पाठविण्यासाठी पत्र, दवंडी यांचा वापर केला जात होता, या परिस्थितीत बदल होऊन समाज माध्यमांमुळे एखादी वार्ता क्षणार्धात असंख्य नागरिकांपर्यंत पोहचत आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक संचालक अनुपमा पवार म्हणाल्या, पूर्वी संवाद केवळ समोरा समोर साधला जात असे, मात्र तंत्रज्ञानाच्या युगात साता समुद्रापलीकडची व्यक्ती देखील कधीही कोणाशीही संपर्क साधू शकते. आपण सर्वजण सोशल मिडीयाचे महामित्र होत असतांना या माध्यमाचा विघातक परिणाम होणार नाही याची दक्षता देखील घेतली पाहिजे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रकल्प संचालक आरती डोळस म्हणाल्या, समाज माध्यमांवरील चर्चा ही समाजोपयोगी काम करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुशिक्षित लोकांवरती विकासाचा गाडा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी दिली होती. समाज माध्यमांचा चांगला वापर करुन आपल्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे.
महिला व बालविकास विभागाच्या सहायक आयुक्त सुवर्णा पवार म्हणाल्या, अग्नीचा उपयोग हा प्रकाश निर्माण करण्यासाठी जसा होतो तसाच तो आग लावून विध्वंस घडविण्यासाठी देखील होऊ शकतो. हे लक्षात घेऊन समाज माध्यमे समाजात प्रकाश निर्माण करण्यासाठी वापरावीत. सोशल मिडीया महामित्रसारख्या उपक्रमाव्दारे शासकीय योजनांची अधिकाधिक माहिती पोहचवावी.
स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ म्हणाले, तरुण विद्यार्थ्यांना असंख्य संधी उपलब्ध होत आहेत, अशा उपक्रमाच्या माध्यमातून एक चांगली संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देता आली. नव-नवीन उपक्रम राबवून समाजमाध्यमांचा समाजहितासाठी उपयोग करावा.
उपसंचालक मोहन राठोड यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले व प्रास्ताविकपर भाषणात समाज माध्यमांचा उदय आणि माध्यमांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. या उपक्रमातून होणाऱ्या नवीन सकारात्मक बदलाची माहिती त्यांनी दिली तसेच उपक्रमाचे उद्दिष्ट, भूमिका आणि गटचर्चेसंबंधी माहिती दिली.
यावेळी उपस्थित निरीक्षक व परीक्षक यांना श्री. राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महामित्र संकल्पनेअंतर्गत निवड झालेल्या व्यक्तींना सुवर्णा पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात संविधानाची (प्रास्ताविका) प्रत देऊन गौरविण्यात आले.
सहभागी व्यक्तींना ॲपद्वारे डिजीटल प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार असून त्यांना वर्षभर मोफत लोकराज्य मासिकाचे अंक पाठविण्यात येणार आहेत. संवादसत्रासाठी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट ठरलेले स्पर्धक सहभागी झाले. जिल्ह्यातील विविध क्षेत्रात गटचर्चेतून उत्कृष्ट ठरणाऱ्या स्पर्धकास राज्यस्तरावर गौरविण्यात येणार असल्याचीही माहिती जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी मानले. सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले. संवाद सत्रात पुणे शहरासह जिल्हयातील शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.