पुणे :- आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गासाठी परवडणाऱ्या घरांच्या गृहनिर्मितीमध्ये दिलेल्या असामान्य योगदानासाठी क्रेडाईला अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पीएमएवाय पुरस्काराने केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते दिल्ली येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.
‘पी.एम.ए.वाय- एम्पॉवरिंग इंडिया अवार्ड्स २०१९’ची संकल्पना ही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप (पीपीपी) आणि खासगी गुंतवणूकीच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी खासगी विकसक,वित्तीय संस्था,ओद्योगिक संघटना यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना प्राधान्य देऊन पंतप्रधानांचे सर्वांना २०२२ पर्यत घरे मिळावीत हे ध्येय पूर्ण करणे असे होते.
क्रेडाईने केंद्र सरकारशी अहमदाबाद मध्ये ३९६ परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प देण्याचा सामंजस्य करार केला होता. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या ५ वर्षात ५ लाखांहून अधिक घरांची निर्मितीसाठी देखील क्रेडाई – महाराष्ट्रने राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्रामध्ये ३० स्क्वेअर मीटरच्या ४ लाख घरांची आणि ६० स्क्वेअर मीटरच्या ८ लाख घरांची कामे प्रगतीपथावर आहेत. या घरांचे काम येत्या २ ते ४ वर्षात पूर्ण होईल. या सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी क्रेडाई नैशनलच्या अफोर्डेबल हौसिंग कमिटीचे अध्यक्ष आणि क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला असून त्यात कामे योग्य पद्धतीने सुरु आहेत जी दिलेल्या वेळेत पूर्ण होतील अशी माहिती दिली.
विकसकांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘अफोर्डेबल हौसिंग गाईडन्स फोरमची ’ क्रेडाई महाराष्ट्रने स्थापना केली असून त्याद्वारे राज्यस्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विशेष कायदेशीर सहाय्य विभाग, बांधकाम खर्चाचे प्रशिक्षण,कामगारांचे कौशल्य प्रशिक्षण आणि २४x७ अफोर्डेबल हौसिंग संदर्भातील हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही समिती देशभरातील १२५०० सदस्यांना परवडणाऱ्या घरांच्या निर्मातीसंबंधी वेगवेगळ्या पैलूंची माहिती सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी मागच्या ५२आठवड्यांपासून प्रत्येक रविवारी ई-बुलेटीन पाठविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.
तसेच परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीची संपूर्ण माहिती देणारे “हौसिंग फॉर ऑल पॉलिसी ॲन्ड प्रैक्टिस” या पुस्तकाचे प्रकाशन १४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडीअम येथे ‘क्रेडाई युथकॉन’मध्ये केंद्रीय राज्यमंत्री हरदीप पुरी यांच्या हस्ते देशातील ३००० विकसकांच्या उपस्थित झाले.