पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी
सुरू झालेली १०८ ही सेवा महाराष्ट्राची जीवनदायिनी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री
एकनाथ शिंदे यांनी केले. आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करणारे १०८ चे डॉक्टर व
पायलट यांचा सत्कार सभारंभ सांगवी येथिल मुख्यालयात नुकताच संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी
बीव्हीजीचे उपाध्यक्ष डॉ. दत्ता गायकवाड, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.
ज्ञानेश्वर शेळके उपस्थित होते.
मंत्री शिंदे पुढे म्हणाले, १०८ या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. राज्यात ९३७
रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून ऑगस्ट २०१९ पर्यंत ४३ लाख १५ हजार ९ रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या
सेवेमुळे शक्य झाले आहे.अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय
मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात
आलेल्या रुग्णवाहिकेत राज्यात सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा,
पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये
दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती
राज्यात २०१४ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत सुमारे 3 लाख ४९ हजार १६ रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात
दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार
सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील
रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला
गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी
१०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची
सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.
डॉ. शेळके म्हणाले, मागील पाच वर्षांत राज्यात सुमारे ३३ हजार ३२८ गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश
मिळाले आहे. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात
मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली
आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली
येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहेत.
पूरग्रस्तांना अशी केली मदत
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या वतीने सांगली जिल्ह्यात २४ रुग्णवाहिका कार्यरत आहे. कोल्हापूर
जिल्ह्यात ३६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्याच बरोबर सातारा जिल्ह्यात ३२ रुग्णवाहिका कार्यरत आहेत.
कोल्हापूर, सांगली व साताऱ्याला पुराचा वेढा बसल्याने १० अतिरिक्त रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या.पूरस्थिती
असताना ५८१९ रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती. यात एका गोंडस बाळाचा सुद्धा जन्म
झाला होता.