नोव्हेंबर २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. समुद्रमार्गे आलेल्या दहा दहशतवाद्यांनी २६ ते २८ नोव्हेंबर २००८ या तीन दिवसांत मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांवर घडवलेला नरसंहार स्मृतिपटलाच्या आड कधीही करता येणार नाही. खरं तर कोणत्याही वाईट आठवणीला उजाळा देणं म्हणजे खपली धरलेल्या जखमेला टोकरण्यासारखंच. पण २६/११ च्या हल्ल्यातील आठवणी या केवळ जखमा नाहीत, तर महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचं अकल्पनीय धैर्य, पराक्रम, सहनशीलता आणि संयमाचंही ते उदाहरण आहे. आणि आता हे वास्तव आपल्याला झी युवा या वाहिनीवर अनुभवायला मिळणार आहे.
दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामधील नरिमन हाऊस मध्ये तत्कालीन पोलीस सहाय्यक आयुक्त इसाक बागवान यांनी दाखवलेले शौर्य उल्लेखनीय आहे. नरिमन हाऊस हे इस्त्रायली नागरिकांचे श्रद्धास्थान. दहशतवाद्यंनी २६/११च्या रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यावर हल्ला चढवला. इमारतीतील रहिवाशांना ओलीस ठेवून काहीतरी गडबड आहे म्हणून विरोध करण्यास आलेल्या स्थानिकांवरही दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. तेव्हा त्या जागी पोहोचणारे पहिले पोलीस अधिकारी हे इसाक बागवान होते. तेव्हापासून सुरू असलेला संघर्ष पुढील दोन दिवस सुरू होता. इसाक बागवान आणि त्यांचे ८ सहकारी यांनी त्याच्या सर्व्हिस रिव्हाल्वर १८ तास दहशतवाद्यांबरोबर संघर्ष केला आणि एका अतिरेक्याला जायबंदी सुद्धा केले. अनेक रहिवाश्यांचे प्राण या शूर योध्यामुळे वाचले. एनएजसीच्या कमांडों येईपर्यंत ह्या अधिकाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता, स्वतःचे कर्तव्य बजावत एक इतिहास घडवला. हाच इतिहास त्यांच्याच नजरेने झी युवा आपल्या समोर आणत आहे. २६/११ हल्ल्याची सुरुवात खरं तर २५/११ ला पाकिस्तानमध्ये झाली. त्यामुळे २५/११ या दिवसाचे महत्व लक्षात घेत झी युवा इसाक बागवान यांच्या शौर्य कथेचा पहिला भाग शुक्रवार २५/११ ला रात्री ९ वाजता प्रदर्शित करत आहे. आणि याच कथेचा दुसरा भाग २६/११ याच दिवशी रात्री ९ वाजता आपल्याला अनुभवायला मिळेल. इसाक बागवान यांना या त्यांच्या शौर्यासाठी त्यांच्या आयुष्यातील तिसरे राष्ट्रपती पदक सुद्धा मिळाले आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी, प्रेक्षकांचा आवडता अभिनेता सचिन खेडेकर करणार आहेत. त्यांचा दर्जेदार आवाज या कार्यक्रमाला मिळणार आहे. सचिन खेडेकर यांना अभिनय करताना पाहणे नेहमीच प्रेक्षकांना आवडते, मात्र यावेळी त्यांच्या आवाजातील अभिनय प्रेक्षकांना “ऐकायला” मिळेल.
या कार्यक्रमाच्या निर्मितीबाबत बोलताना झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले कि आपला पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्याला मन आहे, भावना आहे, कुटुंब आहे. त्याच्या खांद्यावर समाजाच्या सुरक्षेची धुरा दिली आहे, कर्तव्यदक्ष आणि धाडसी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्यगाथा लोकांसमोर आणि मुख्यतः आजच्या पिढीसमोर येणं खरंच महत्वाचं आहे. हा कार्यक्रम अश्या शूरवीराचे शौर्य सर्वांपुढे अतिशय योग्य रित्या मांडण्यासाठीच आम्ही “शौर्य – गाथा अभिमानाची ” हा कार्यक्रम सादर करीत आहोत.
“शौर्य – गाथा अभिमानाची या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.