मुंबई-देशभरात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसने केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसेभत केले होते. त्यानंतर देशभरात राजकारण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत उद्यापासून काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर ‘माफी मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून महाराष्ट्राची माफी मागावी असे फलक घेऊन उभे राहणार आहोत, असे पटोले म्हणाले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देश टाळेबंदीचे पालन करत होते. दरम्यान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. काँग्रेसनेच लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असाच संदेश त्या नेत्यांनी दिला. काँग्रेसने लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाची परिस्थिती निर्माण केली. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आणि देशभरात कोरोना पसरला.’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर केला होता.