नवी दिल्ली- देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यास भाग पाडले, त्यासाठी त्यांना मोफत तिकीटे देण्यात आली असल्याचा आरोप देखील नरेंद्र मोदींनी केला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या विषयावर भाष्य केले आहे. पंतप्रधान असे बोलल्याने मला स्वतःला वैयक्तिकपणे खूप दुःख वाटले असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
वैयक्तिकपणे दुखः वाटले
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीमधून आपण आता बाहेर पडतोय. राज्य हे अडचणीमध्ये आहेत, कोरोनाची तिसरी लाट ओरसत आहे. नोकऱ्यांचा प्रश्न आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण अपेक्षित होते. मात्र पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राविषयी जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याचे मला वाईट वाटले. राज्याने भाजपला 18 खासदार निवडून दिले आहेत. मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे सर्व धक्कादायक आहे.’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तर मी मान्य केले असते
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘ कोरोना काळात लोक एकमेकांना धावून मदत करत होते. मला कोरोना काळात एक फोटो कुणी तरी पाठवला होता. या फोटोमध्ये एक महिला होती. आणि बॅग देखील होती त्यावर मूल झोपलं होतं, वडील बॅग ओढत होते. खाली एक टॅग लाईन होती. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मै. मला आता पंतप्रधान मोदींना हाच प्रश्न विचारयाचा आहे. माननीय पंतप्रधानजी तुमसे नाराज नही हूँ. हैरान हूँ मै आपसे. आम्ही सुपर सप्रेड आहोत, असे कसं काय बोलला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे. तसेच त्यांनी थोडाही शास्त्रीय आरोप केला असता, तर मी मान्य केले असते. मी केवळ टीका करायची म्हणून टीका करत नाही. मी महाराष्ट्राची कन्या म्हणून त्यांच्याकडे न्याय मागत आहे. तुम्ही असा आरोप का केला? तुम्ही राज्या-राज्यात द्वेष पसरवत आहात?’ असा सवाल सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना केला आहे.