सध्याच्या काळात माणसाला जगण्याची लढाई अवघड होत चालली आहे,प्रत्येक वस्तूंची मग ती जीवनावश्यक असो,वा चैनीची असो त्यांची दरवाढ प्रचंड झालेली आहे,केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करून त्यांना हि दरवाढ सोसत येईल अशी सोय जरी सरकारने केली असली तरीही कोट्यावधी जनता महागाई च्या वणव्यात होरपळते आहे, सरकारने किती कर लावावा ? प्रत्येक वस्तूचे उत्पादन मूल्य किती ? आणि ती ग्राहकापर्यंत पोहोचते तेव्हा तिचे किती मूल्य असते ? याबाबत आपल्याकडे काहीही कायदा नाही.शेतमालाचे भाव ठरविणाऱ्या सरकारने औषधांसह सर्वच क्षेत्रात प्रचंड करवाढ करून सरकारी तिजोरी भरण्यासाठी महगाई करून ठेवली आहे याचा जाब विचारायला कोणीही पुढे आलेले नाही.सारे वेगळ्याच विश्वात रमत आहेत,हिंदू मुस्लीम वाद जो पूर्वी कधीच देशातून नाहीसा होत चालला होता तो आता पुन्हा डोके वर काढून हैराण करू पाहणारा ठरत असताना ब्राम्हण विरुद्ध बहुजन असा वाद हि पराकोटीला पोहोचविला जातो आहे.नेमके ज्याला रोजचे पोट भरायची चिंता आहे तो या वादात नसला तरी या वादाने तोच प्रथमतः खाक होणार आहे.
कट्टर जातीयवादी असलेले किती लोक आपापल्या समाजात आहेत ? आणि ती प्रत्यक्षात कोण कोण आहेत ? त्यांचे व्यवसाय,उद्दिष्ट्य नेमका काय आहे ? हे प्रथमतः समजून घेणे गरजेचे आहे.जातीयवादाची हि विषवल्ली समाजात पसरवून नेमके त्यामुळे परिणाम कोणावर काय काय होतील याचाही विचार केलेला बरा.
या सर्व गोष्टी समजून घेतल्या तर जातीयवाद हा निव्वळ स्वार्थासाठी काही मंडळी पसरवत असल्याचे दिसून येणार आहे.
या देशात जोपर्यंत जात -पात आहे तोपर्यंतच काही मुठभरांचेच साध्य साधले जाईल आणि कोट्यावधी जनता होरपळत राहील हे स्पष्ट आहे.त्यामुळे जातीयवाद पसरविणारी मांडली ती कोणीही असो,राजकीय असो, अराजकीय असो, वा कर्तव्ये विसरलेली माध्यमे असो वा कला क्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील असो अशांंना लोकांनी दूर ठेवणेच योग्य ठरणारे आहे.