मुंबई, 8 मे: राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची आणि लागणाऱ्या लसी विकत घेण्यासाठी चेकही तयार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्याबरोबरच खाजगी रुग्णालयात पैसे भरून लस दिली जाईल, असेही घोषित केले. मग सरसकट सर्वाना मोफत लसीबाबत केलेल्या घोषणेला काय अर्थ आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आज भाजपातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात प्रविण दरेकर बोलत होते.
लसीकरण केंद्राबाहेर पाणी, मंडप, स्वच्छतागृह या सुविधा तातडीने द्या
दरेकर म्हणाले, सरकारने मोफत लसींची घोषणा केली असली तरी योग्य नियोजन नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, व्याधीग्रस्त नागरिक केंद्रांसमोर तासनतास रांगेत उभे राहिल्याचे आपण पहात आहोत. अनेकांना लसीकरणाशिवाय परत जावे लागत आहे, कडक उन्हाळा असताना सरकारने मंडप वगैरेची व्यवस्थाही केलेली नाही. एकूणच लसीकरणाबाबत या सरकारचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे जनतेला प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राबाहेर पाणी, मंडप, स्वच्छतागृह आणि इतर सर्व सुविधा सरकारने तातडीने पूरव्यात, अशी मागणी दरेकर यांनी केली.
मुंबई महापालिकेने स्वतः पैसे खर्च करून सर्व मुंबईकरांना मोफत लस द्यावी
प्रत्येक मुंबईकरांसाठी 300 रुपये पकडले तर फक्त 300 कोटी रुपये मुंबईकरांच्या लसीसाठी लागतील. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे सर्व मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेने स्वतःच्या तिजोरीतून पैसे खर्च करून मोफत लस द्यावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.
लसी असताना लस नसल्याबाबतचे खोटे चित्र सरकार उभे करीत आहे
लसीच्या उपलब्धतेबाबत केंद्र सरकारवर होणाऱ्या आरोपांबाबत दरेकरांनी स्पष्ट केले की, राज्यसरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाते. परंतु, केंद्र सरकारशी समन्वय साधून, लसी उपलब्ध करून घेऊन गतीने लसीकरण होणं अपेक्षित होत. परंतु, आपली निष्क्रियता झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री केंद्रावर ढकलण्याचे काम करीत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात 35 लाख जादा लसी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात साडेबारा कोटी व 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले 8 कोटी 50 लाख नागरिक आहेत तर 1 कोटी 90 लाख पेक्षा जास्त वायल केंद्र सरकारने महाराष्ट्राला मोफत दिल्या आहेत. भारताच्या लसीकरणाची व्यापकता बघायची असेल तर इंग्लडमध्ये 2 मे, 2021 ला 3 कोटी 60 लाख लोकांचे लसीकरण झाले आणि भारतात 7 मे 2021 ला 16 कोटी 49 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर नाहक टीका करण्यापेक्षा आपल्या राज्यात गतीने लसीकरण कसे होईल, याकडे सरकारने लक्ष द्यावे, असेही दरेकर म्हणाले.
महाराष्ट्राकडे आज रोजी 10 लाख लसी असताना महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये नागरिकांना लस मिळत नाही, असे चित्र मुद्दाम उभं केलं जातं आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत राज्य सरकारने काय नियोजन केलं आहे, हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेसमोर सरकारने आणावं, अशी मागणी दरेकर यांनी केली.
राज्यात लसींचे समन्यायी वाटप का होत नाही
केंद्र सरकार लसींचे समन्यायी वाटप करीत आहेत. पण तरीही केंद्राकडून लसींचे समन्यायी वाटप व्हावं, अशी मागणी सातत्याने मांडली जाते. दुसऱ्या बाजूला राज्यात लसींचे समन्यायी वाटप होत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून दरेकर म्हणाले सांगलीला 7 मे, 2021 अखेर 6 लाख 13 हजार 804, साताऱ्याला 6 लाख 41 हजार 700 डोस दिले जात असताना त्याच काळात सिंधुदुर्गला 1 लाख 32 हजार आणि रत्नागिरीला 1 लाख 78 हजार डोस दिले गेले. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात समन्यायी वाटप का केले गेले नाही, याचा खुलासा करावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.