पुणे :
सूसगाव (ता.मुळशी)च्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत प्लास्टिक कचरा मुक्तीचा ठराव करण्यात आला. या ठरावातंर्गत कचर्याला कागदोपत्री मुक्त करण्याचा ठराव प्रजासत्ताक दिनी संमत केला गेला. भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारचा ठराव एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रजासत्ताक दिनी घेण्यात आला आहे. ज्यामध्ये कचरा ओला आणि सुका वर्गीकरण करणे तसेच समस्याग्रस्त प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला. गावामधील 25 महिला बचत गट देखील या वर्गीकरणात मदत करणार आहेत.
यावेळी ‘वसुंधरा स्वच्छता अभियान’चे अनील गायकवाड, ‘सागर मित्र’चे विनोद बोधनकर, ‘वनराई’चे मुकुंद शिंदे, मकरंद टिल्लू, ‘जन आधार’चे ललित राठी, शैलेंद्र पटेल, ग्रामपंचायत सरपंच नारायण चांदेरे, उपसरपंच गणेश ससार, ग्रामसेवक अनिल फुलपगर, कचरा व्यवस्थापक राहुल तापकीर, संजय ससार उपस्थित होते.
या ठरावामध्ये संपूर्ण प्लास्टिक बंदी न करता समस्याग्रस्त प्लास्टिक कचरा बंदी करण्यात आली. यामध्ये हॉटेलमधील चहाचे प्लास्टिक कप अशाप्रकारच्या प्लास्टिकचा समावेश आहे. ज्या प्लास्टिक कचर्याचा पुर्नवापर करता येत नाही अशा प्लास्टिकवर बंदी करण्यात आली.
कचरा व्यवस्थापकांद्वारे ग्रामपंचायतीकडे या प्लास्टिक कचरा मुुक्तीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर हा ठराव संमत झाला. भारतात अशा प्रकारचा ठराव संमत करणारी सूस ग्रामपंचायत ही पहिलीच ग्रामपंचायत आहे. मुळा नदी स्वच्छ करण्यासाठी या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.
संपूर्ण गावातील जमा झालेल्या प्लास्टिक कचर्यावर ‘ऑटो क्लस्टर’ पद्धतीने प्रक्रिया करून कचरा व्यवस्थापन करण्यात येणार आहे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. या प्रक्रियेला सहकार्य किशोरी गद्रे (पालिकेच्या माजी घनकचरा प्रकल्प प्रमुख) करणार आहेत. ग्रामसभेमध्ये मकरंद टिल्लू यांनी नळ गळती अभियानाद्वारे पाणी बचतीचे महत्व ग्रामस्थांना समजावून सांगितले.