पुणे – ‘वनराई’ने देशाच्या ग्रामीण भागात आणि वनसंवर्धनाचे मूलभूत काम केले असल्याने देशानेच या कामाचे गुणगान केले आहे. आज आपण जीडीपी (स्थूल उत्पादन निर्देशांक) किती वाढला याची चर्चा करतो. पण माणसांचे जीनवमान उंचावण्यासाठी जीडीपीऐवजी एचडीपी (मानवी विकास निर्देशांक) महत्त्वाचा असून, गुडलाईफ पेक्षा गुडनेस महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी आज केले.
सिंगापूरस्थित कु. मेहेक पुणतांबेकर या १५ वर्षीय शाळकरी मुलीने ‘डान्सिंग इन दी रेन’ (टेन स्टोरीज वन आयडिया) हा कथासंग्रह लिहिला आहे. वनराईकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या कथासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योजक आणि लीला पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा लीला पूनावाला यांच्या हस्ते वनराईच्या इको हॉल येथे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. या प्रसंगी ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया, विश्वस्त श्री. रोहिदास मोरे व्यासपीठावर उपस्थित होते. या पुस्तकाच्या विक्रीतून येणारे पैसे मेहेक हिने ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणवर खर्च करण्यासाठी वनराई संस्थेला देण्याचे जाहीर केले. या प्रसंगी पुण्यातील अंध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अमोल खर्चे आणि स्केटिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणा-या सौंदर्या साळुंखे यांचा सत्कार भाई वैद्य व लीला पूनावाला यांनी केला. याच कार्यक्रमात लेखिका कु. मेहेक पुणतांबेकर हिचा सत्कार लीला पूनावाला यांनी केला.
भाई वैद्य म्हणाले, ‘‘वनराई ही देशातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणारी संस्था असून, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी पैसेवाल्या लोकांऐवजी ग्रामीण भागातील लोकांकडे लक्ष दिले. हे करत असतानाच निसर्ग संवर्धनाचे कामही हाती घेतले. त्यामुळेच या कामाचे देशाने कौतुक केले आहे. जीवनात पैसा महत्त्वाचा असला तरी त्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक जास्त महत्त्वाचा आहे. हेच नेमके काम वनराई गेली अनेक वर्षे करत आहे. यावेळी त्यांनी वनराईच्या विकासकामांतून गावडेवाडीच्या झालेल्या कायापालटाचा आवर्जून उल्लेख केला. मेहेक पुणतांबेकर, अमोल खर्चे आणि सौंदर्या साळुंखे यांचेही त्यांनी कौतुक केले.
लीला पूनावाला म्हणाल्या, ‘‘जीवनात अशक्य असं काहीच नाही. आपण ठरवलेले ध्येय्य साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. यशस्वी होणे म्हणजे काय?केवळ पैसा मिळवणे म्हणजे यशस्वी होणे नव्हे. जीवनात आनंदी रहाणे म्हणजे यशस्वी होणे. त्यामुळे जीवनात अगोदर आनंदी रहायला शिका आणि नंतर पैसा मिळवा,’’ असा सल्ला त्यांनी तरूणांना दिला. यावेळी त्यांनी वनराई आणि पद्मभूषण डॉ मोहन धारिया तथा अण्णांबरोबर काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रास्ताविक करताना वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी सांगितले की, ‘‘वनराई ही पर्यावरण संवर्धन, वनीकरण आणि जल-मृद संधारण क्षेत्रात तर काम करतेच, पण त्याचबरोबर तरूण पिढीला प्रोत्साहन देण्याचेही काम वनराईकडून केले जाते. ज्या वयात मुले कॉम्प्युटरवर गेम खेळत असतात किंवा नवीन काय आहे ते इंटरनेटवर शोधत असतात, त्या वयात मेहेकने पुस्तक लिहिले, तर अमोलने क्रिकेट या खेळात देशाचे प्रतिनिधीत्व केले आणि सौंदर्याने स्केटिंग खेळात प्राविण्य मिळवित एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावनोंदवले. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात पुढेही सातत्य राखावे म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा वेगळा कार्यक्रम वनराईने आयोजित केला आहे.’’
पुस्तकाचा व लेखिकेचा परिचय करून देताना मृदुला चौधरी यांनी मेहेक हिने तिला आयुष्यात प्रभावित केलेल्या व्यक्तींबद्दल संशोधन व अभ्यास करून कथेच्या रूपात लिहिली असल्याचे सांगितले. मेहेक हिने मनोगतात सांगितले की, ‘‘या पुस्तकाच्या लिखाणातून मला यशामागे केवळ कष्ट नसतात तर त्यामागे खंबीर व ठामपणे असलेले नातेसंबंधही असतात, हे दिसले व यांचाही तेवढाच मोठा वाटा यशात असतो याची जाणिव प्रकर्षांने झाली.’’
यावेळी क्रिकेटपटू अमोल खर्चे याने मनोगतात सांगितले की, ‘‘अडचणी कोणाला येत नाहीत आम्हाला अंध म्हणून येतात पण दृष्टी असणा-यांनाही अडचणी येतातच, मग त्याबद्दल न्यूनगंड बाळगण्याचे काहीच कारण नाही. याच भावनेतून मी क्रिकेट खेळलो आणि देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली, विश्वचषक जिंकून देण्यात हातभार लावता आला. अंधांसाठीचा टी २० वर्ल्डकपचा एक सामना पुण्यात आम्ही घेणार आहोत.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनराईचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले, तर वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी आभार प्रदर्शन केले.
खेळाडूंविषयी
अमोल खर्चे – दक्षिण अफ्रिकेत २०१४ साली झालेल्या अंध क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात अमोलची महाराष्ट्रातून निवड झाली होती. त्याने या संधीचे सोने केले आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदानही दिले. वर्ल्डकप जिंकून आल्यानंतर संघाबरोबर त्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटण्याची संधी मिळाली.
सौंदर्या साळुंखे – ही सोलापूरची असून तिने स्टुडंट ऑलिंपिक असोसिएशन महाराष्ट्राच्या स्पर्धेत राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे तिची निवड इंदौर येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. तिने सतत २४ तास बॅकवर्ड स्केटिंग करण्याचा विक्रम केला. त्याची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे