मुंबई-राज्यात आमचेच सरकार आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपच्या युतीसाठीच आम्ही मते मागितली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा शिवसेना नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे वारंवार सांगितले होते. त्यामुळे जनतेनी आम्हाला मते दिली होती. पण शिवसेनेने दगाफटका केला. असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना राज्यातील सरकार गेल्याचे दु:ख नाही, शिवसेनेने धोका दिल्याचे दु:ख आहे, अशी खंत रावसाहेब दानवेंनी बोलून दाखवली.
दरम्यान यावेळी बोलताना जनतेने युती पाहून मतदान केले. मात्र जनतेशी आणि आमच्यासोबत धोका झाला. आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. त्यांच्यातून एखाद्याला धोका झाला असेल आणि आम्हाला येऊन मिळाला असेल तर आमचा काय दोष? असा टोलाही त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरून लगावला आहे.
शिवसेनेचे हिंदुत्त्व बेगडी आहे, त्यामुळे त्यांना आम्ही हिंदुत्त्ववादी आहोत हे सांगायची वेळ आली आहे. यावरून त्यांचे बेगडी हिंदुत्त्व आहे हे स्पष्ट होते आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमचे नेते दत्तापंत ठेंगडी हे नेहमी एक उदाहरण देते होते, पूर्वी दुकानावर तुपाचे दुकान असे लिहलेले असायचे. आणि आता शुद्ध तुपाचे दुकान अशी पाटी लावलेली असते. याचा अर्थ भेसळ आहे हे स्पष्ट होते. शिवसेनेचे ही तसेच झाले आहे, हिंदुत्व सोडले नाही हे शिवसेना सांगते. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. तर यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हिंदुत्वावादी आहोत हे सांगाव लागत नव्हते. उलट लोकच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत होते, असेही दानवेंनी म्हटले आहे.