मंदिरे उघडण्याचा निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण
मुंबई दि. १४ नोव्हेंबर- राज्यातील सरकार पाडून दाखवा..पाडून दाखवा… असे कोणीही बोलले नसताना त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच त्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्य़ाची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मारला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतक-यांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा गमजा ते मारत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणतात की, यामुळे साधे खरचटले नाही, पण भाजपाने काही ठरविले तर खरचटायचे तर दूर राहिले, रक्तबंबाळ व्हाल असा इशारा देतानाच दरेकर म्हणाले की, थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहे, पण बोलायाला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते. मग थडगी काय आणि दुसरे काय सर्वांनाच पर्दाफाश करता येईल, त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण
राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे सरकारला उशिराने सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार,जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहनही दरेकर यांनी यावेळी केली आहे.