पुणे, दि.२६ सप्टेंबर:“ सरकारने शिक्षणाची रूपरेषा तयार करून ती विद्यार्थ्यांवर थोपवली आहे. देशातील शिक्षण संस्थांमधून विद्यार्थी नाही तर प्रोडक्ट बाहेर पडत आहे. त्यामुळेच शिक्षणाची पद्धत पंगू बनत आहे. देशातील जवळपास सर्वंच शिक्षण संस्था या गुलाम बनल्या आहेत. येथील विद्यार्थी सुटाबुटात दिसतो पण चाणक्ष बुद्धिवान दिसत नाही. त्यामुळेच असे म्हणू शकतो की देशाचा आत्माच भ्रष्ट झालेला आहे.” असे विचार तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेच्या सातव्या सत्रात ‘ सार्वजनिक संस्थांची पवित्रता कमी होणे तथ्य किंवा खोटेपणा’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी राज्यसभेचे खासदार जी.व्ही.एल नरसिम्हाराव, मध्ये प्रदेश येथील आमदार हिना कावरे, आमदार डॉ. संदीप सौरव आणि गौरव वल्लभ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, रवींद्रनाथ पाटील आणि प्रा. परिमल सुधाकर हे उपस्थित होते.
तुषार गांधी म्हणाले,“ सरकारने देशाच्या चार महत्वपूर्ण स्तंभावर घाव घालून त्याला अतिशय कमकूवत बनविण्याचा प्रयत्न केला आहे. या देशाचे दुर्भाग्य आहे की आम्ही आपल्या पेक्षा कमकुवत देशाबरोबर तुलना करून आम्ही मोठे आहोत हे सिद्ध करण्याचा मागे लागलो आहोत. त्यामुळे अशा मानसिकतेतून बाहेर निघावे. लोकशाही या शब्दाचा अर्थच जनतेला कळत नाही असे वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भ्रष्ट झालेल्या लोकशाहीचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात लोकशाही शक्ती बनेल या दिशेने युवकांनी कार्य करण्यासाठी आवाज उठवावा.”
आमदार डॉ. संदीप सौरव म्हणाले,“ सरकारने देशातील बर्याच सामाजिक संस्था व विद्यापीठांवर हल्ले केले आहेत. केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या भर्तीबद्दल बर्याच वाईट गोष्टी समोर येतांना दिसतात. युनिव्हर्सिटीमध्ये युनिवर्सच्या गोष्टी सोडून बाकी सर्व काही घडतांना दिसत आहेत. देशात निर्णय घेणार्यांना बाजूला डावलून भलतेच लोक निर्णय घेतांना दिसतात. देशात लोकशाही वाचली नाही तर समाजिक संस्था सुद्धा वाचणार नाही.”
गौरव वल्लभ म्हणाले, “ न्यायसंस्था, शासन, प्रशासन आणि मीडिया चार स्तंभावर आधारित लोकाशहीमध्ये शेतकर्यांना डावलून त्यांची बील अमलात आणणे योग्य नाही. तसेच संसदेत कित्येक असे बील आहेत जे काही मिनिटांमध्येच पास केल्या जाते. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की संसदेची पवित्रता कमी होते की वाढत आहे. तसेच एका रात्रीत सीबीआय अधिकारी बदलतात काय. माध्यमातील लोकांचे फोन टॅप करून त्यांची विश्वसनियता धुळीस मिळविली आहे. या देशाचे दुर्भाग्य होते की आमच्या अर्थमंत्र्यांनाच माहिती नव्हते की देशात नोटबंदी होत आहेत. कारण नसतांना जीएसटी लागू करणे हे चुकीचे आहे. यामुळे असे म्हणू शकतो की सार्वजनिक संस्थांची पवित्रता किती टिकविली जात आहे. देशाची आर्थिक स्थितित सुधार आणण्यासाठी मागणी वाढविण्यावर भर दयावा. त्यातूनच नवीन रोजगार निर्मिती होईल. या देशात पार्सीयल डेमॉक्रॉसी होत आहे. त्याला बदलणे गरजचे आहे.”
हिना कावरे म्हणाल्या,“ सरकार ज्या पद्धतीने कार्य करीत आहेत त्यामुळे देशातील सर्व सार्वजनिक संस्थानांची पवित्रता संपुष्टात येत आहेत. या देशात तेव्हात लोकशाहीचा विजय होईल जेव्हा कोणताही भेद भाव न करता सर्व संस्थानांची पवित्रता बाधित ठेवील. सरकारने संस्थानांच्या नियुक्तीच्या पद्धती बदलल्या आहेत. देशातील न्याय पालिका आणि निवडुक विभाग यांच्यावर अंकुश लावण्यात आले आहेत.”
जी.व्ही.एल नरसिम्हाराव म्हणाले,“भारतीय लोकशाही ही सुंदर व परिवर्तनशील आहे. त्यामुळे भारतीय संसदेच्या प्रतिनिधिंनी जनकल्याण करणे हे मुख्य कर्तव्य आहे. पंतप्रधान हा देशाचा मुख्य भाग असून तो रबरी स्टॅम्प नसून त्यांच्या बद्दल असे बोलणे योग्य नाही. अशा प्रकारची मानसिकता बदलण्याची गरज आहे. देशातील न्यायव्यवस्था व निवडणुक विभाग अतिशय सक्षम असून त्याद्वारे लोककल्याण होत आहे.”
विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी बेले, रॉगर सोलेमन, रसिक रजा, धनंजय सोनावणे, सुभम गौतम यांनी आपले विचार मांडले.
प्रा.डॉ. प्रशांत दवे यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा. चयनिका बसू यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. पोर्णिमा इनामदार यांनी आभार मानले.