पुणे- राज्य सरकारने फुटकी कौडी दिली नाही असा आरोप जाहीरपणे काही महिन्यांपूर्वीच सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केल्याचे अनेकांना आठवत असेल ,आता कोरोनाच्या काळात पुण्याला राज्य सरकारची भरीव मदत नसतानाही आपण कधी राजकारण केलेलं नाही असं स्पष्ट करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्य सरकारने पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक तर घेतली पण त्यास महापौर म्हणून मला निमंत्रण दिलेले नाहीच ,महापौरांना त्यांनी डावलले नाही तर पुणेकरांना त्यांनी डावलले आहे , हे पुणेकर कायम लक्षात ठेवतील असा इशाराही मोहोळ यांनी दिला आहे. प्रसिद्धीसाठी आपले म्हणणे आज महापौरांनी माध्यमांकडे सायंकाळी ४.४० ला पाठविले.
या प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या मेसेज मध्ये महापौर यांनी असे म्हटले आहे की ,
‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. कोरोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही.
उलट मी कोरोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेऊन पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करुन न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत.
गेल्या चार वर्षांत झालेली पुणे शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरु असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे. तरीही आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच !