पुणे- राज्यात मद्य विक्रीला परवानगी देण्यापेक्षा विविध धर्मांच्या सर्व देवस्थानांच्या तिजोरितील रक्कम बिनव्याजी वापरावी, अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक ,माजी उपमहापौर आबा बागुल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या मागणी संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यलयातर्फे कळविण्यात आले आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वच देवस्थानांना आवाहन केले तर आपल्याला इतका निधी मिळेल जो केवळ मद्य विक्री नाहीतर वर्षभरात मिळणाऱ्या महसुलापेक्षा अधिक असेल. त्यासाठी जनतेने देवाला घातलेल्या साकडे पोटी दानपेटीत जमा झालेली ८० टक्के रक्कम बिनव्याजी देवस्थानांनी द्यावी.
सरकार ती रक्कम नंतर परत करेल, असा करारनामा करणे उचित ठरेल. अन्यथा आज गरीब जनता अन्नासाठी देवाचा धावा करत असताना जर मद्यविक्रीला परवानगी दिली, तर लोकांच्या घरी अन्नासाठी असलेले पैसे राहणार नाहीत. कौटुंबिक हिंसाचार वाढेल, शिवाय मद्यविक्री अनेक संकटाना निमंत्रण देणारी ठरेल.
राज्यातील जनतेची वर्गवारी पाहिल्यास त्याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मद्यविक्री परवानगीपेक्षा जनतेने विविध देवस्थानांना दिलेल्या देणगीरुपी रकमेचा विनियोग या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा करून घेता येईल, याला आपण प्राधान्य द्यावे.
हजारो कोटी रुपये जनतेनेच देवांना दानपेटीत अर्पण केलेले आहेत. ते तिजोरीत तसेच पडून राहण्यापेक्षा देवस्थानांशी लेखी करार करून बिनव्याजी ते वापरावेत आणि ते पुन्हा त्यांना परत करावेत. आज देवाचा धावा करणाऱ्या जनतेला देवस्थानांकडे जनतेनेच दिलेल्या दानाचा आधार मिळावा, असेही बागुल यांनी म्हटले आहे