नवरात्रीतील ९ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे माहितीपत्रक राहीने ‘सखी ग्रुप’वर टाकले – ‘सख्यांनो सर्वांच्या सोयीनुसार दुपारची वेळ ठरवली आहे आणि आसावरी त्याआधी २ दिवस ‘Google Meet’वर आरती, भजन, स्तोत्र यांची रंगीत तालीम घे गं, म्हणजे आयत्या वेळी अडचण येणार नाही.’ राहीने जवळजवळ फर्मानच काढले. व्हॉटसअपवर नुसते गुड नाईट-गुड मॉर्निंग आणि फॉरवर्डेड मेसेज न पाठवता कोडी, बुद्धीला खाद्य मिळेल असे काहीसे चालू ठेवायचे; नाविन्यपूर्ण काय काय शिकता येईल तेही शिकायचं असं आमच्या सखी ग्रुपवर आधीच ठरलं होतं. आता लॉकडाऊनमधील 7 महिन्यांच्या कालावधीत त्यात रोज नवनवीन उपक्रमांची भर पडते आहे. या लॉकडाऊनमध्ये दुपारी सगळी कामं आटपली की निवांत वेळात सकाळपासूनच्या मेसेजेना रिप्लाय द्यायचा आणि रात्री निजानीज झाली की निवांतपणे गप्पा मारायच्या (त्यांच्या भाषेत चॅट करायचं) हा साधारण सर्व महिलांचा व्हाट्सअपवरचा दिनक्रम. तसं पाहिलं तर पूर्वी घरातील बायकांचा निवांत वेळात गप्पा मारण्याचा नेम होताच; पण त्याचं स्वरूप बऱ्यापैकी वेगळं होतं. दुपारच्या वेळात कामाची आवराआवर झाल्यावर, थोडी विश्रांती झाली की कुठे तरी सूप पाखडण्याच्या आवाजाने जाग यायची आणि निवडटीपणाची कामं बाकी आहेत याची आठवण यायची. मग गव्हाचा किंवा तांदळाचा डबा, सोबत चाळणी, ताट, सूप या लवाजम्यासह ग्यालरीत विराजमान व्हायचा. तोपर्यंत आजूबाजूच्या ३-४ घरातील गृहिणी जमा झालेल्या असायच्या आणि गप्पा मारत मारत निवडणं-टिपणं चालू असायचं. घरगुती गोष्टींपासून नाटक, सिनेमा, खरेदी ते अगदी राजकारणापर्यंत अनेक विषयांवरील चर्चांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी अगदी सहज सांगितल्या जायच्या…मन हलकं होऊन जायचं. नव्वदीच्या दशकापर्यंत शहरातील बिल्डिंग आणि चाळ संस्कृतीमध्ये हे चित्र ठळकपणे तरग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात दिसायचं. गावाकडे पारावरच्या गप्पा किंवा कुणाच्या घरी एकत्र जमून निवडणं टिपण किंवा वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ करण्याच्या निमित्ताने गप्पांना ऊत यायचा. शहरात कालांतराने सुपर मार्केटचा उदय झाला आणि चकचकीत प्लास्टिकच्या पिशव्यांमधून स्वच्छ निवडलेलं धान्य घरी येऊ लागलं. तांदूळ निवडणं कमी झालं तरी गप्पा थांबल्या नव्हत्या. कालपरत्वे चाळी पाडून टोलेगंज इमारती उभ्या राहू लागल्या; फ्लॅट संस्कृती आली, त्याबरोबरच कॉमन ग्यालरी जाऊन पॅसेज आणि बंद घरं आली. रोजच्या मनमोकळ्या गप्पांना ब्रेक लागला आणि एकत्रित निवडटिपंणही थांबलं.घरोघरी टेबलवर ट्रिंगट्रिंग करणारे फोन विराजमान झाले होते, पण त्यावर खूप गप्पा ठोकायच्या तर भरमसाठ बिल यायचं. काही वर्षांनी त्यालाही पर्याय निघाला…मोबाईल! सुरुवातीला व्यावसायिकांकडे आढळणारा मोबाईल हळूहळू नोकरदार वर्ग, तरुणाईच्याही हातात अनायसे आला. मोबाईल यत्र सत्र सर्वत्र दिसू लागला. गृहिणी ते ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा, एकदा का नेट पॅक भरला की अनलिमिटेड गप्पा आणि कॉल.खरंतर करोनाच्या काळात या मोबाईलने सगळ्यांनाच तारलं. गृहिणी आणि ज्येष्ठांना मोठा आधारच झाला. चॅट, व्हिडिओ कॉल, झूम यांद्वारे सगळ्यांशी कनेक्ट राहता आलं आणि सुखदुःखाच्या चार गोष्टीही झाल्या. सकाळी योग क्लास, दुपारी अवांतर गप्पा तर कधी गाण्याच्या भेंड्या व सोबत वेगवेगळे विषय, त्यावर चर्चा, ज्ञानात भर घालणारे मेसेज…इथल्या सर्वसमावेशक नेटगॅलरीत हवं तेवढं साठवता येऊ लागलं. बंदिस्त दारात कोंडलेल्या मनाला मोकळा श्वास घ्यायला मिळाला, निवांत वेळ असताना चॅट करता करता… पूर्णिमा नार्वेकर, दहिसरमो. 9820003834