पुणे : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी किंवा या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिले आहे.पार्थ यांनी सोमवारी (ता.२७) मंत्रालयामध्ये जाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली.त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले. तसेच त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. पार्थ यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांच्या नि:पक्षपातीपणे केल्या जाणाऱ्या तपासावर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच बरोबर या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती करावी किंवा हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयडे सोपविण्यात यावे, अशी मागणी केली आहे.”सुशांतच्या दुर्दैवी मृत्युने देशातील कोट्यावधी तरुणांना मोठे दु:ख झाले. तरुण वर्ग निराश झाला आहे. सुशांतला त्वरित न्याय मिळावा, या मागणीसाठी देशातील तरुणाईला माझा पाठिंबा आहे. त्यासाठीच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली. हा मुद्दा आता राज्याच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण देशाच्या दृष्टिने महत्वाचा आहे.संबंधीत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत ३७ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात ‘व्यावसायिक शत्रुत्व’ तर नाही ना, याचा तपास मुंबई पोलिस करत आहे. तसेच याप्रकरणी कंगना राणावत, करण जोहर यांचीही चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. त्यातही गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे, असे असतानाही पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने ‘पार्थ यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.