मुंबई-AICC सदस्य विश्वबंधू राय यांनी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. राय यांनी पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे पक्ष कमकुवत झाला आहे. विश्वबंधू राय हे मुंबई काँग्रेसचे महासचिव आहेत. तसेच ते माजी खासदार संजय निरुपम यांचे निकटवर्तीय मानले जातात.राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसचे 12 मंत्री पक्षाच्या अजेंड्यावर काम करत नाहीत. संघटन मजबूत करण्याबाबत हे मंत्री पूर्णपणे उदासीन आहेत. तसेच पुढे त्यांनी काँग्रेस हायकमांडला आठवण करून दिली की 2019 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईला भेट दिली तेव्हा एसआरए योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना 500 चौरस फूट फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.मुंबईसह सुमारे 10 महापालिकांच्या निवडणुकीपूर्वी लेटरबॉम्ब फुटल्याने काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांची पोलखोल करण्यासाठी हे पत्र लिहिले आहे
काँग्रेसचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयश आले
राय यांनी पुढे लिहिले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होऊनही काँग्रेसचे हे आश्वासन पूर्ण झाले नाही, तर शिवसेनेने 500 स्क्वेअर फुटांच्या सदनिकाधारकांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. ते नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्य सरकारमध्ये काँग्रेसचा समावेश आहे. असे असतानाही जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात कुचराई होत आहे. या व्यतिरिक्त जनतेसोबत वीज बिल माफ करण्याविषयी केलेले आश्वासन देखील पूर्ण करण्यात आले नाही, याविषयी ऊर्जा मंत्र्यांची तक्रार करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेस शिवसेनेच्या संगनमताने चालवली जात आहे
अध्यक्ष भाई जगताप हे शिवसेनेच्या संगनमताने मुंबई काँग्रेस चालवत असल्याचा आरोप विश्वबंधू राय यांनी केला आहे. 36,000 कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक डोक्यावर असुनही मुंबई काँग्रेसकडून एकट्याने निवडणूक लढवण्याची कोणतीही तयारी दिसत नसल्याचे त्यांनी सोनिया गांधींना सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विविध महामंडळांमध्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची नियुक्ती करत आहेत, तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राय यांनी हा प्रश्न देखील उपस्थित केला आहे की, मुंबईमध्ये पक्षाची डिजिटल सदस्यत्व मोहीम सुपर फ्लॉप कशी ठरत आहे. याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिली आहे. राय म्हणाले की, महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग आहे. असे असतानाही पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेला राज्य सरकारने मान्यता दिली नाही. या राजकीय घटनेमुळे मुंबईतील लोकांमध्ये पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.