सैनिक मित्र परिवार तर्फे आयोजन ; अभिनेते सुनील गोडबोले यांची उपस्थिती
पुणे : देशासाठी प्राणांची बाजी लावून लढणा-या आणि वेळप्रसंगी देशासाठी प्राण अर्पण करणा-या सैनिकांच्या कुटुंबियांना भारत माता की जय… च्या जयघोषात व सनई- चौघडयाच्या निनादात कसबा गणपती मंदिराच्या परिसरात मानवंदना देण्यात आली. रांगोळी आणि फुलांच्या पायघडयांनी केलेले स्वागत, सुवासिनींनी केलेले औक्षण आणि थरथरत्या हातांनी ज्येष्ठांसह चिमुकल्यांनी केलेला पुष्पवृष्टीद्वारे सलाम असे देशप्रेमाने भारलेले वातावरण पाहताना वीरमातांना देखील अश्रू अनावर झाले.
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे भाऊबीजेनिमित्त देशासाठी लढताना शहीद झालेल्या व बेपत्ता सैनिकांच्या वीरमातांच्या सन्मान कसबा गणपती मंदिरामध्ये करण्यात आला. यावेळी अभिनेते सुनील गोडबोले, डॉ.विश्वास मेहेंदळे, संपदा सहकारी बँकेच्या संचालिका प्रा. संगीता मावळे, बँक आॅफ इंडिया कर्मचारी संघटनेचे शिरीष राणे, शाहीर हेमंतराजे मावळे, गुणवंत कामगार संघटनेचे सुभाष चव्हाण, कसबा संस्कार केंद्राचे अनिल दिवाणजी, आनंद सराफ आदी उपस्थित होते.
सुनील गोडबोले म्हणाले, सैनिकांमुळे आपल्याला सर्वत्र मनमोकळेपणाने फिरण्याकरिता धीर मिळतो. त्यामुळे सैनिकांचा सन्मान केवळ उत्सवापुरते नव्हे, तर दररोज करणे हे आपले कर्तव्य आहे. सैनिकांसारखी शिस्त आपण पाळणे, हीच शहीद सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल, असेही त्यांनी सांगितले.
वीरमाता गीता गोडबोले, कुसुम ताथवडे, छाया पळसकर, लता नायर यांचा सन्मान यावेळी सन्मान करण्यात आला. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला. गिरीश पोटफोडे, संगीता ठकार, अमोल काळे, भोला वांजळे, कल्याणी सराफ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले.