जालना -”लग्न आमच्याशी ठरले होते पण शिवसेना राष्ट्रवादी अन् काॅंग्रेससोबत पळुन गेली. स्वत: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.”आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढले की ते स्वतःच पळून गेले, याचा निर्णय आता जनतेने करायला हवा” असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका केली आहे.
युपीमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्याआधी, ‘असली आ रहा है नकली से सावधान’ असे बॅनर लावण्यात आले आहे. यावर बोलताना कोण असली आणि कोण नकली याचा फैसला करण्याचा अधिकार मतदाराला आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनताच याचा फैसला करेल, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला आहे. तर इम्पेरिकल डाटाशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, न्यायालयाने हा डाटा द्या अशी कोणतीही सुचना केली नाही. कोर्टाने जेव्हा राज्य सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागत आहे. तेव्हा ती राज्य सरकारची जबाबदारी आहे.
हे राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलेले आहे. वीज प्रश्न, कोविडचा काळ, मराठा आरक्षण, धनगर किंवा ओबीसींचे आरक्षण असू द्या, सर्वच ठिकाणी ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली आहे. ओबीसीवर अन्याय करणे हे राज्य सरकारचे धोरण आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर
युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून सुरू असलेल्या,’ असली आ रहा है नकली से सावधान’ या बॅनरबाजीवर रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अच्छे दिनाच्या वक्तव्यावर देखील दानवेंनी टीका केली आहे.
जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते. मात्र शिवसेनेने धोका देत सत्तेसाठी भाजपला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली असा आरोप दानवेंनी केला आहे. मुख्यमंत्री झाले, तुम्हाला तर अच्छे दिन आले. मात्र त्यामुळे राज्यातील 12 कोटी जनतेला बुरे दिन आले, असा टोला दानवे यांनी लगावला.