पुणे-महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 49 लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यातील तळई गावात एक मोठी घटना घडली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तळई गावातील काही घरांवर डोंगराचा ढिगारा कोसळला आहे. ज्यामध्ये 35 पेक्षा जास्त घरे दबली गेली आहे. या घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मदत व बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहे. आतापर्यंत 32 लोकांचे मृतदेह काढण्यात आले असून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी लोकांना जवळील उपचार केंद्रात दाखल केले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळई गावात गुरुवारी दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळाली असून एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. भोर-महाड मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला.
साताऱ्यात भूस्खलनात 8 लोकांचा मृत्यू
रागयड पाठोपाठ साताऱ्यातील आंबेघर गावातदेखील भूस्खलन झाले आहे. यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त लोक मलाब्याखाली दबले गेले आहेत. रायगड आणि साताऱ्यातील भूस्खलनात 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे.मुंबईतदेखील सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील प्रमुख भागात पाणीच पाणी साचले आहे. शुक्रवारी मुंबईत इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक एकाच परिवारातील असून यामध्ये 6 लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मुंबईतील राजवाडी औमर सायन रुग्णालयात भरती करयात आले आहे.नद्यांचे पाणी शहरे आणि खेड्यांमध्ये शिरले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस कोकण, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्यात बुडाले आहेत. कोकण विभागात पावसाशी निगडित घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 700 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपासून दोन मीटर जास्त आणि वशिष्ठ नदी जवळपास एक मीटर उंचीवरुन वाहत आहे. काजळी, कोडावली, शास्त्री आणि बावंडी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गढी आणि उल्हास नद्यादेखील धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत.12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमशंकर ज्योतिर्लिंगमध्ये आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती आहे. मंदिराच्या पुजार्यांनी शुक्रवारी महादेवचीआरती अर्ध्या पाण्यात उतरून केली. हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड येथे स्थित आहे.
भोर तालुक्यात तब्बल ११ ठिकाणी कोसळल्या दरडी
भोर तालुक्यात पावसाचा कहर गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. संतंतधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील भोर-महाड रस्त्यावर जवळपास ११ ठिकाणी तर पसुरे, पांगारी, धारमंडप रस्त्यावर तीन ते चार ठिकाणी मोठमोठ्या दरडी कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन जेसीबीच्या साह्याने दरडी काढण्याचे काम सुरु आहे. मात्र, पावसाचा जोर जास्त असल्याने सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला असून यामुळे वाहतूकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.
भोर तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासुन मुसळधार पाऊस पडत आहे. भोर-महाड रस्त्यावरील हिर्डोशी गावाच्या हद्दीत ३ ठिकाणी तर वारवंड गावाच्या हद्दीत २ ठिकाणी तर शिरगाव आणि वरंध घाटात ७ ठिकाणी दरडी पडल्याने दोन दिवासांपासुन वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गुरूवारी रात्री पुन्हा हिर्डोशी परिसरात ३ ठिकाणी वारवंड गावाच्या हद्दीत २ ठिकाणी तर उंबार्डेवाडी जवळ आणि वरंध घाटात ११ ठिकाणी पुन्हा दरडी कोसळ्याने वाहतूक बंदच आहे.
महाड रस्त्यावरुन धारमंडपमार्गे शिळीब पसुरे जाणाऱ्या रस्त्यावरील अशिपी, कुंड राजिवडी, साळुंगण गावाजवळ डोंगरातील दगड माती झाडे रस्त्यावर येऊन दरड पडल्याने वाहतूक बंद झाली. अशिपी गावाजवळ रस्ता खचल्याने वाहतूक बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबीच्या मदतीने दरडी झाडेझुडपे काढण्याचे काम सुरु आहे. आंबाडखिंड घाटातही पडलेली दरड काढली आहे. रस्ता वाहतुकीस खुला केला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले. पऱ्हर व कुडली या गावाजवळ दरड पडल्याने रस्त्यावरील वाहातुक पुर्णपणे बंद झाली आहे. रस्त्यावरील पडलेली झाडे झुडपे दरडी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. तर धानवली गावाला जाणारा रस्ता खचल्यामुळे येथील वाहातुक बंद झाली आहे. यामुळे लोकांचा संर्पक तुटलेला आहे.
आंबोली घाट मार्ग तब्बल १४ तासांनंतर पूर्ववत
गुरुवारी सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाट मार्गात अनेक ठिकाणी दरडीची माती व दगड कोसळल्यामुळे आंबोली घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती . मात्र, तब्बल १४ तासानंतर ही दरड, दगड व माती जेसीबीच्या सहाय्याने दूर करण्यात आल्यानंतर आंबोली घाट मार्गावरील वाहतूक शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पूर्ववत झाली. गुरुवारी मध्यरात्रीपासून या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आंबोली घाटामध्ये गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला होता. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर आंबोलीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली व तात्काळ वाहतूक थांबवली. यानंतर शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेही भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. आंबोली पोलिस प्रशासनाकडून बांधकाम विभागाला वारंवार याबाबत खबर देण्यात आली. परंतु म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद बांधकाम विभागाकडून मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
आंबोली घाट रस्ता हा नेहमी पावसाळ्यात छोटी मोठी दरड कोसळल्याने बंद पडत असतो. त्या अनुषंगाने सध्याची पर्जन्यवृष्टी पाहता बांधकाम विभागाने कायमस्वरूपी जेसीबी व रस्ता कामगार यांची नेमणूक करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने तत्काळ दरडी काढता येणे शक्य असतानाही नाहक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. बांधकाम विभागाच्या गलथानपणाबद्दल या वेळी वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
निवृत्त रस्ता कामगार शिवराम गावडे यांच्या म्हणण्यानुसार आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन गटारे वेळच्या वेळी साफ केल्या असत्या तर आंबोली घाट सुरक्षित राहिला असता. तसेच वनविभागाने धबधब्यांवर बांधलेले बंधारे यामुळेही पाण्याचे चुकीच्या पद्धतीने प्रवाह मार्गस्थ होऊन मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत आहेत आणि भविष्यात कोसळण्याची भीतीही निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान,बांधकाम विभागाच्या वेळकाढूपणा मुळे दरड हटविण्यात उशीर झाला असेही स्थानिकांकडून सांगण्यात आले.
दूध भाजीपाला व पोल्ट्रीच्या गाडया अडकल्याने मोठे नुकसान
आंबोली घाट मार्गातून विशेषत: कोल्हापूर व बेळगांव येथून सिंधुदुर्ग व गोव्यात मोठ्या प्रमाणात दूध, भाजी, अंडी व कोंबडी आणली जातात. त्यातच गगनबावडा घाट मार्ग आधीच बंद झाल्याने कोल्हापूरहून सर्वच वाहतूक आंबोली मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच आंबोली घाटात दोन ठिकाणी मोठी दरड कोसळल्याने त्याचा फटका भाजी व पोल्ट्री व्यवसायिकांना बसला. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रस्ता पूर्ववत झाल्यावर पोल्ट्री, दूध व भाजीपाल्याच्या गाड्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. मात्र, तब्बल १४ तास या गाड्या अडकल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात होते.
पुणे जिल्हयातील 22 जुलै 2021 रोजी पावसाने झालेल्या नुकसानीबाबतचा अहवाल
आंबेगाव तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 17.60 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
- मौजे कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळुन मुख्य रस्ता बंद झाला असता, सदयस्थितीत रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. पावसाचा जोर कमी झाला असून परिस्थिती सामान्य आहे.
- कोणत्याही प्रकारची मनुष्य व पशु हानी झालेली नाही.
भोर तालुका– तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 41.25 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
1.महाड महामार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला होता, परंतू काल मध्यरात्री पुन्हा दरड कोसल्यामुळे जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे.
- साळुंगण या ठिकाणी डोंगराचा काही भाग वाहून आलेला असून त्यामुळे स्मशानभूमी पुर्णपणे त्याखाली गाडली गेली असून मातीचा ढिगारा दोन जेसीबीच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काम सुरू आहे.
- कनकरवाडी गावालगतचा ओढा तुंबल्याने व पावसाचा जोर असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहे.
मावळ तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 171.34 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
रस्ते अडथळे दूर करण्यात आले आहेत, कुटुंब स्थलांतरित करण्यात आली आहेत. पाऊस सदयस्थितीत रिमझीम सुरू आहे.
खेड तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 14.78 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
- आरळा कळमोडी धरण 100% भरले असून सदयस्थितीत पावसाचा जोर ओसरला आहे.
- मौजे नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटलेल्या याचा पंचनामे कृषी अधिकारी करत आहेत. तर परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवेली तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 12.20 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
- खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.
- आज दुपारी 1 वाजता 3412 क्यूसेसने खडकवासला धरणातून विसर्ग केलेला आहे.
मुळशी तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 166.33 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
मोजे माले येथील परिस्थिती सामान्य असून, मदतकार्य पोहचली असून इतर परिस्थिती सामान्य आहे.
वेल्हा तालुका- तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 139 मीलीमीटर पावसाची नोंद झाली.
मौजे जाधववाडी येथे भटटी वाघदरा ते पासली दे दरम्यान भुस्खलन होऊन रस्ता बंद होता. तो पूर्ववत करण्यात आला आहे.
जिल्हयातील या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.