मुंबई. ‘आम्ही महाराष्ट्रातील सरकारला पाठिंबा दिला असला, तरी आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाही,’ या राहुल गांधींच्या वक्तव्याचा भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरपू समाचार घेतला. ‘काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. सत्तेत असूनही निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवावी’, असा हल्लाबोल विखे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केला.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले की, ‘राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. एकीकडे सरकारमध्ये राहायचे आणि दुसरीकडे आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे सांगायचे. तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर तुम्ही सरकारमध्ये कशाला थांबलात?’, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. पुढे ते म्हणाले की,’ काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार नाही तर सत्तेतून बाहेर पडायची हिंमत दाखवा. सध्या काँग्रेसची अवस्था डबलढोलकी सारखी झाली आहे, असेही विखे पाटील म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
‘महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहे. परंतू, आम्ही मुख्य निर्णयकर्ते नाहीत. आम्ही पंजाब, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये मुख्य निर्णयकर्ते आहोत. सरकार चालवणे आणि सरकारला पाठिंबा देणे हा यातला फरक आहे’, असे राहुल गांधी म्हणाले होते.