डीजीटल युगांत ‘कार्पोरेट कर्मचाऱ्यांच्या समस्या’ देशाच्या उत्पादकतेशी संबंधित… गोपाळदादा तिवारी
‘कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या’ हक्कांसाठी राज्यव्यापी अभियानाची घोषणा..!
पुणे :
जगातील अमेरीका आदि प्रगत देशातून भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे देशातील डीजीटल क्षेत्रात त्याचा परीणाम जाणवत असून ‘हजारोंचे पोशींदे’ समजल्या जाणाऱ्या वर्गास न्याय मिळवून देण्याचा ‘व्हाईट टी शर्ट रिव्होल्युशन’ या सामाजिक संस्थेचा उपक्रम स्तुत्य व अभिनंदनीय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. क्यू-आर कोड वरून ॲान लाईन गुगल फॅार्म भरून आयटी क्षेत्रातील बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच हा सर्वेक्षण उपक्रम असल्याने त्याचे स्वागत केले पाहिजे असे ही ते म्हणाले.
माहिती तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रात वाढत्या नोकरकपातीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अलीकडेच मायक्रोसॉफ्टसारख्या जागतिक कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्याने रोजगाराच्या – सुरक्षितते बाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत ‘व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशन’ या सामाजिक संस्थेने कॉर्पोरेट क्षेत्रातील मनुष्य बळाच्या, कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, कौटुम्बिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्या हक्कांसाठी ‘कॉर्पोरेट न्याय’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याची घोषणा जेष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांचे उपस्थितीत पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या उपक्रमाद्वारे कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर धोरणात्मक उपाय सुचविण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे सदस्य ऋत्विक धनवट यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशनचे संस्थापक ऋत्विक धनवट यांनी उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि पुढील वाटचाल याविषयी माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी मुठा नदी पात्रात संस्थे तर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.
कॉर्पोरेट क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लोकसहभागातून उभारला जाणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर संस्थापक सदस्य आशुतोष प्रदीपराव पवार यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर प्रकाश टाकला. वाढत्या नोकरकपाती, असुरक्षित रोजगार, मानसिक ताण, दीर्घ कामाचे तास, पगारातील स्थिरता, काम-जीवन समतोलाचा अभाव, महिलांसमोरील आव्हाने तसेच रोजगार धोरणांतील त्रुटी इ सारख्या मुद्द्यांचे तांत्रिक आणि कायदेशीर पैलू त्यांनी स्पष्ट केले.
या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा आवाज थेट लोकप्रतिनिधीं पर्यंत पोहोचवून आवश्यक धोरणात्मक बदल घडवून आणण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांनी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या समस्या या केवळ कामाच्या ठिकाणापुरत्या मर्यादित नसून त्या कुटुंब, समाज, अर्थव्यवस्था आणि देशाच्या उत्पादकतेशी थेट संबंधित असल्याचे विषद केले. त्यामुळे हा विषय सामाजिक न्यायाचा असून संपूर्ण समाजाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला व्हाईट टी-शर्ट रिव्होल्यूशनचे सदस्य सिद्धांत जांभुळकर, अक्षय कांबळे, स्वप्नील शेळके आणि पवन खरात यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
‘कॉर्पोरेट न्याय’ या उपक्रमांतर्गत व्यापक जनसहभागातून सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यातून तयार होणाऱ्या शिफारसी महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनातील लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

