- पालखी मुक्कामाच्या काळात वाहतूक नियोजनात बदल
पुणे | संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविकांची गर्दी होणार असल्याने नागरिकांनी शक्यतो मध्यवर्ती भागात जाणे टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे नियोजन केले आहे. पालखी शहरात दाखल झाल्यानंतर दोन्ही पालख्यांचा मुक्काम नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात असणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.मनोज पाटील यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याच्या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक काम नसल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात येणे टाळावे. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या वाहनचालकांनी मध्यवर्ती भागातून जाण्याऐवजी बाहेरील पर्यायी मार्गांचा वापर करावा.नगर रोड आणि सोलापूर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी खराडी बायपास मार्गाचा वापर करावा.सातारा रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी कात्रज–कोंढवा मार्गाचा वापर करावा.तसेच मुंबईकडून येणाऱ्या आणि नगर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश न करता पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.पालखी मुक्कामाच्या परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे नाना पेठ, भवानी पेठ आणि लगतच्या परिसरातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी केलेल्या नियोजनाला सहकार्य करावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.पालखी सोहळा निर्विघ्न पार पडावा, वारकऱ्यांची सुरक्षितता कायम राहावी आणि शहरातील वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.दरम्यान, पालखी सोहळ्यामुळे कोणत्या भागातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे आणि वाहनचालकांनी कोणते पर्यायी मार्ग वापरावेत, याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी व्हिडिओद्वारे दिली आहे.

