“वहिनी, उद्या वडाची पूजा नाही…परवा आहे ना?” फोन ठेवतच सचिनने विचारलं. “नाही रे, मला काहीच कल्पना नाही.”…माझं उत्तर देऊन मी पुढे निघाले. उद्या वटपौर्णिमा आहे याची परत एकदा आठवण झाली. दुपारी तशी भारतीने आठवण करून दिलीच होती. उद्या तिचीही सुट्टी होती. कारण वड पुजायला जायचे होते आणि त्यात उपवास करायचा असतो ना. खरं तर गेल्या आठवडाभर ती पावलोपावली आठवण करून देत होती. म्हणजे काहीतरी विषय निघायचाच. पूजेसाठी नवीन साडीला फॉल ब्रीडिंग करून झाले, ब्लाउज सुद्धा टेलरने वेळेत शिवून दिला…इति भारती. वाटलं, केवढी ही जय्यत तयारी! त्यात सचिनच्या प्रश्नाने आश्चर्यच वाटले. वडाच्या पूजेची याला चिंता, हा पुजायला जाणार की उपवास करणार?? या वटपौर्णिमेच्या विचारात स्टेशन कधी गाठले ते कळलेच नाही. ज्या कामासाठी आले होते, त्याला थोडा वेळ लागणार होता; मग काही काळ प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. २-३ बायका बसल्या होत्या, तिकडे थोडी जागा करून बाकावर बसले. अर्थात तिथेही तेच…उद्याची चर्चा! अगं, बरं झालं…रविवारची वटपौर्णिमा आली. एक रजा वाया गेली असती, नाहीतर हाफ-डेने तरी कामावर जायला लागले असते. दोघींमध्ये चाललेल्या गप्पा ऐकून एकंदरीत वाटायला लागलं…खरंच आम्हा स्त्रियांना वटपौर्णिमेचं महत्त्व उमगलंय की, एक क्रेझ म्हणून आहे हा उपवास. बाजारात सगळीकडे पूजेच्या साहित्याचे वाटे विकायला बसले होते. जांभळं, फणसाचे गरे, रायवळ आंबे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाच्या फांद्या. त्याही अव्वाच्या सव्वा किमतीत. (दोन दिवसांपूर्वीच भाजीवाल्या विजयाने आठवण करून दिली होती – रायवळ आंबे घेऊन जा, नंतर महाग होतील आणि जांभळं, फणसाचे गरे हवे असतील तर आताच सांगून ठेवा. त्या दिवशी मिळतील की नाही ते सांगू शकत नाही.) तरीही बायका भक्तीभावाने ते खरेदी करत होत्या…कारण वड पूजायचा आहे ना!
काही सोसायटींमध्ये तर ग्रुपने सगळ्या बायका मस्त नटूनथटून पूजेला जातात. इतकेच नाही तर त्यासाठी आधी भटजींकडे वेळही ठरवली जाते. जवळपास कुठे एखादे वडाचे झाड आहे का, याची एक-दोन आठवडे आधी चाचपणी सुरू होते. बाकी ३६४ दिवस त्या वडाच्या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नसेल; वटपौर्णिमेला मात्र त्या वडाच्या झाडाची भलतीच वट. या वडाच्या झाडाचे एवढेच महत्त्व. झाड नसेल तर वडाची फांदी घरी आणून त्याची साग्रसंगीत पूजा??? पण कुणाच्याच मनात येत नाही की त्यासाठी वृक्षतोड केली जाते. इकडे पाऊस नाही, दुष्काळ पडतोय म्हणून ‘पाणी फाऊंडेशन’ आणि ‘नाम फाऊंडेशन’ त्यासाठी झाडे लावताहेत, नवनवीन उपक्रम करताहेत; तर इथे या युगातील सावित्री पूजेसाठी झाडाची फांदी घरी आणतेय आणि दुसऱ्या दिवशी ती कचऱ्याच्या डब्यात फेकतेय. केवढा हा त्या वडाचा दैवदुर्विलास! एकीकडे पाऊस पडावा म्हणून वरुण यंत्राचा प्रयोग ग्रामीण भागातील लोकांनी करावा, अशी विनंतीची पोस्ट व्हाट्सअपवर सगळ्या ग्रुपवर फिरत असते; तर दुसरीकडे पूजेसाठी वडाच्या फांद्यांची खरेदी??? किती हा विरोधाभास. याचा विचारच मनाला स्पर्श करत नसावा का…? झाडं वाचवायलाच हवीत. वड म्हणजेच वटवृक्ष जो नैसर्गिक व्हेंटीलेटरचे काम करतो; म्हणजेच वातावरणात मुबलक प्राणवायू सोडण्याचं काम हे झाड करतं. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर ठळक उपाय, असं हे झाड वाचवलं पाहिजे की निव्वळ पूजेसाठी त्याच्या फांद्या तोडल्या पाहिजेत? वडाची पूजा करणाऱ्या प्रत्येक सावित्रीला याची जाणीव व्हायला पाहिजे. भटजींनी फक्त पूजा सांगू नये, तर त्यातून प्रबोधन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने सावित्रीने हा वड जपायला हवा.
पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068