‘लॉकडाऊनमध्ये लग्न करणं म्हणजे मोठं चॅलेंज आहे गं. कालच आमच्या इकडे एक लग्न झालं. एका वेळी ५० माणसं असं टप्प्याटप्प्याने दीडशे माणसांना बोलावलं. असा तोडगा काढून नियम पाळलेत, नातेवाईकांना दुखावलं नाही व आपली हौसही केली.’ – कल्पना मावशीने सांगितलेला हा नाशिकच्या लग्नाचा किस्सा.
लॉकडाऊनमध्ये लग्नच होता होता मुश्किल व माणसंही लिमिटेड हवीत. लग्नाची बोलावणी करायला कुणाच्या घरीही जाता येणार नाही मग लग्नपत्रिकांचा वायफळ खर्च कशाला?? निमंत्रणं फार थोडी आहेत त्यांना व्हाट्सअप पत्रिका पाठवली की झालं! अशी मानसिकता हल्ली प्रत्येक लग्नघराची झाली आहे. प्रिटिंगचा व्यवसाय करणाऱ्या नितीन कदम यांनी या बाबतीत त्यांची व्यथा मांडली. ‘आमचा व्यवसाय तर पुरता बसला. तो पूर्ववत कधी होईल याची शाश्वती नाही. गिरगावातील खाडिलकर रोड हा लग्नपत्रिकेसाठी फेमस आणि सतत उत्साहाने गजबजलेला परिसर, तिकडील भयाण शांतता आता बघवत नाही.’ तिथल्या काही नावाजलेल्या दुकानांनी पत्रिकेसोबत सॅनिटायझर आणि मास्क विकायला ठेवले आहेत. लग्नात आता त्यांची जास्त गरज आहे. पत्रिका छापल्या जातात पण फक्त १०-१५…त्याही देवासमोर, हॉलसाठी आणि मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी लागतील म्हणून.
कोल्हापुरातील गद्रेंच्या मुलीच्या जवळच्या मैत्रिणीचे लग्न लॉकडाऊनच्या पिरिअडमध्ये झाले. खरंतर लग्न करोना संक्रमणाच्या आधीच ठरलेलं आणि मेमध्ये कोल्हापुरात संपन्न होणार होतं. दोन्हीकडची मंडळी कोल्हापूरची, त्यामुळे गोतावळाही मोठा. पण करोनाच्या पीडेमुळे विवाहस्थळ बदलावं लागलं. लग्नपत्रिका तरी कशा आणि कुणाला देणार? मोजक्या माणसांनाच बोलवायचे, त्यामुळे लग्नपत्रिकेवर संक्रात आली. म्हणजेच पत्रिका छापल्या नाहीत. काही मंडळी ५०च्या संख्येतून स्वेच्छेने कटाप झाली. गद्रे म्हणाले, ‘वधू बालमैत्रीण असल्यामुळेच माझी मुलगी लग्नाला गेली. एरवी कार्यबाहुल्यामुळे मला जायला जमलं नसतं तर मुलगी माझ्यावर रागावली असती; परंतु कोविडपोटी लादलेली बंधनं तिनेही समजून घेतली. कोविडने समजूतदारपणा दिला या युवा पिढीला, असं म्हणायला हरकत नाही.’
मालाडच्या हेमा लाड ठौकर यांच्या नागपुरातील भाचीचं, आर्याचे लग्नही लॉकडाऊनच्या आधीच ठरले होते. साखरपुडा आणि लग्न हॉलवरच होणार होते. हॉलचा ऍडव्हान्स देऊन झाला होता. नागपूरला लग्न म्हणजे सगळं काही बढिया आणि रीतिरिवाजात, थाटामाटात संपन्न होणार होतं. दोन्हीकडचा गोतावळाही मोठा. कुणास बोलवायचे, कुणास नाही हा मोठा प्रश्न. अखेरीस लॉकडाऊनच्या या सगळ्या विवंचनेतून मार्ग काढत नवीन घेतलेल्या टुबीचके फ्लॅटमध्ये, दोन्हींकडून मिळून फक्त १८ माणसांच्या उपस्थितीत १५ जूनला लग्न पार पडले. देश-परदेशातील नातेवाईक तसेच मित्रमंडळींनी त्या दिवशी सकाळी ११ वाजता ‘झूम’वर या लग्नाला उपस्थिती लावली आणि वधूवरांना ऑनलाईन आशीर्वादही दिले.
लॉकडाऊनमध्ये लग्न करायचे म्हणजे डोंबिवलीच्या विनायक डांगेंची केवळ वरपरीक्षा नाही तर सत्वपरीक्षाच होती. ‘लग्न गेल्यावर्षीच ठरले होते. वधू अस्मिता ठाण्याची असल्यामुळे, लग्न ठाण्यात करायचे नक्की झाले होते. १९ मेचा हॉल बुक झाला होता आणि न भूतो न भविष्यती मार्चमध्ये करोनाचे संकट उभे ठाकले. पहिल्यांदा याचे गांभीर्य कुणाला जाणवले नाही. २४ मार्चला झालेला पहिला लॉकडाऊन हा हा म्हणता १४ एप्रिलला संपेल, असंच वाटलं होतं.’…विनायक सांगत होते….’लग्न मे महिन्यात आहे त्यामुळे तयारी करायला वेळ आहे अशा भ्रमात असतानाच लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्याची बातमी आली. लग्न पुढे ढकलण्याशिवाय गत्यंतर नव्हते. डिसेंबरमध्ये धुमधडाक्यात लग्न करता येईल असं मनोमन ठरवलं होतं. ५ जूनला पहिला अनलॉक जाहीर झाला. करोनाचा प्रादुर्भाव अजून वाढतच चाललाय त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यापेक्षा जूनमध्येच करावे, अशा विचाराप्रत आलो. त्यासाठी काय काय करावे लागेल याचा धांडोळा घेतला. आधी सासरच्या मंडळींची संमती मिळवली आणि मग १५ जूनला ठाण्यात लग्न करायचे योजले. माणसंही दोन्हीकडून फक्त पन्नासच बोलावता येणार होती. त्यामुळे इतर नातेवाईक, मित्रमंडळींनीही काकू केले नाही. बाहेरून येणाऱ्या नातेवाईकांसाठी ई-पास, हॉलची नियमावली, पोलिसांची परवानगी, लग्नाला येणाऱ्या सगळ्यांचे डॉक्टरांचे सर्टिफिकेट, आधार कार्ड अशी सगळी जंत्री जमवायची होती. बरं आयत्यावेळी हॉल कॅन्सल झालाच तर सोसायटीच्या टेरेसचा पर्याय होता. एकंदरीत प्रत्येक गोष्टीचा प्लॅन ए, प्लॅन बी तयार करूनच ठेवला होता. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिसमध्ये रजेसाठी अर्ज टाकला. लग्नखरेदी, बाहेर फिरायला जाणे या सर्व गोष्टींची नवलाई, मजा, उत्साह अनुभवता आला नाही ही खंत होती. तरीही सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती आणि खऱ्या अर्थाने ‘वरपरीक्षा’ पास करून शासनाच्या नियमावलीप्रमाणे १५ जूनला मी व अस्मिता बोहल्यावर चढलो. हा अनुभव मला कळत नकळत खूप काही शिकवून गेला. संयम, धैर्य, चौकस विचार, टाळता येणारे अनावश्यक खर्च…अविस्मरणीय अशा लॉकडाऊनच्या लग्नातील अनुभवाची शिदोरी मला आयुष्यभर उपयोगी पडणारी आहे.’ विनायक डांगेंचा अनुभव ऐकताना अंगावर काटा आला. काय काय दिव्य पार पाडली असतील यांनी.
दहिसरमधील एका नामवंत केटरर्सने सांगितलेली माहिती – एप्रिल-मे-जून हा आमचा पिक सिझन या करोनामुळे पूर्ण वाया गेला. एप्रिल-मे महिन्यात ज्या क्लायंटची लग्न होती त्यापैकी काहींनी घरातच लग्नं उरकली, काहींनी आता कॅन्सल केलीत तर काहींनी पुढे ढकलली. जर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन संपला तर या सगळ्यांना मुहूर्तांप्रमाणे तारखा आणि हॉल कसा काय अड्जस्ट करायचा हा मोठा यक्षप्रश्नच आहे. ५ जूनला पहिला अनलॉक जाहीर झाल्यावर चौकशीसाठी फोन खणखणले की फक्त हॉल द्या, जेवण मात्र आम्ही घरूनच आणू. २०० पेक्षा कमी माणसांचं जेवण बनवणं आम्हाला परवडत नाही आणि समोरचा क्लायंट ५० माणसं लग्नाला येणार आहेत तरीही त्यात डिस्काउंट मागतो, घासाघीस करतो. कमीत कमी स्टाफ, सिक्युरिटी, हेल्थ चेकअप, मास्क, सॅनिटाईझर या सर्व गोष्टी आम्हाला जातीने बघाव्या लागतात. बराचसा स्टाफ गावी निघून गेला आहे आणि जे आहेत त्या सगळ्यांना सांभाळून काम करावे लागते आहे. एवढी सगळी काळजी घेऊनही कोणी करोना पॉझिटीव्ह निघाले तर? करोनात लग्नाचे आयोजन म्हणजे आमच्यापुढे इकडे आड तिकडे विहीर.
लग्नपत्रिका, प्रिंटर, भटजी, केटरर्स, ब्युटिशियन या सर्वांबरोबरच फोटोग्राफर हा एक अविभाज्य भाग. मात्र त्यांनाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. दादरमधील फोटोग्राफर सतीश शेवडे म्हणाले की, ‘साधारण जानेवारीच्या आसपास नवीन कॅमेरा, लेन्स आणि इतर अत्याधुनिक सामुग्रीची खरेदी होते. बऱ्याच वेळा त्यासाठी लोनही घ्यावं लागतं. एप्रिल-मेच्या सिझनमध्ये ते भरून निघतं. दुर्दैवाने यावेळी ज्यांनी लोन घेतले त्यांच्याकडे कामच नाही तर लोनचे हफ्ते फेडायचे कसे? असलेल्या ऑर्डर्समध्येही पैशासाठी वाटाघाटी कराव्या लागतात. सकाळी ७ ते ४ आम्ही सतत उभे राहून फोटो काढतो. ज्वेलर्स तुमचे पैसे कमी करतो का??…तुम्ही दागिने घेतातच ना. लग्नातले विधी कमी होतात का??. सप्तपदीच्या सात ऐवजी तीनच फेऱ्या मारतात का?? समारंभातील एकेक क्षण आम्हाला टिपायचा असतो. आमच्या कलेचे काहीच मोल नाही का? आम्हा फोटोग्राफर्सच्या खूप संघटना आहेत पण त्यात एकजूट नाही.’
डोंबिवलीच्या पराग भिडेंचाही अनुभव काही वेगळा नाही. लॉकडाऊनमध्ये खास काम नाही. ३० जूनला एका लग्नाची ऑर्डर होती. अडीच महिन्याने कामासाठी हातात कॅमेरा धरल्याचा आनंद काही वेगळाच होता. सगळे नियम पाळून लग्न पार पडले. नेहमीसारखा उत्साह आणि मोकळेपणा नव्हता. चेहऱ्यावरील तजेला आणि हास्य हरवले होते, फोटोसाठी ‘स्माईल प्लिज’ म्हणताना ते जाणवले. मनासारखे कॅन्डीड फोटो मिळणे मुश्किल, ग्रुप फोटोतही सोशल डिस्टंसिंग होते. या अशा वातावरणात फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूट ही बिकटच समस्या आहे. फोटोग्राफर्सनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. एक ऑर्डर ३-४ जणांनी विभागून घ्यायला हवी. पैसे कमी मिळाले तरी चालेल पण प्रत्येकाला काम मिळेल. काम नाही म्हणून येणारे नैराश्य कमी होईल. मी तरी हे अमलात आणतोय. तसं पाहिलं तर पुढील काही महिने छोट्या ऑर्डर्सच मिळतील; कारण डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप वाट बघावी लागणार. सर्व काही सुरळीत होईपर्यंत ते शक्यच नाही.
दरवर्षी एप्रिल-मे हा लग्नसराईचा सिझन. शाळा-कॉलेजना सुट्टी त्यामुळे लेकीसुना, पाहुणे मंडळी आधीपासून सगळ्या विधींना येऊ शकतात. याचा विचार करूनच बरीचशी लग्नं या महिन्यांत होतात. जनजीवन सुरळीत असताना लग्न करणे सुकर पण या लॉकडाऊनमध्ये वऱ्हाडी मंडळी आणि लग्नसमारंभाशी निगडित असलेले सगळेच सहनशक्ती, संयम, तडजोड दाखवून, नियमांचे पालन करून आपली हौसमौज पुरवून अविस्मरणीय असे सावधानतेत शुभमंगल पार पाडताहेत. करोनाची घटिका कधी संपतेय आणि सुमुहूर्त कधी येतोय, त्याचीच प्रतीक्षा आहे.
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068