पुणे-स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर्कशुद्ध विचारांची मांडणी करीत असताना ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घातली हे निर्विवाद सत्य असल्याचे मत विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
‘विद्यावैभव प्रकाशना’च्या वतीने डॉ. शरद कुंटे यांनी लिहिलेल्या ‘एक द्रष्टा महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर-चिंतनसूत्रे’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना अभ्यंकर बोलत होते. लेखक डॉ. कुंटे, प्रकाशक बकुळ पराडकर, प्राचार्य रवींद्र येवले व्यासपीठावर उपस्थित होते.
अभ्यंकर म्हणाले, ‘सावरकरांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी नटलेले होते. त्यांनी अजरामर वाङमयाची निर्मिती केली. हिंदू धर्म, हिंदुत्त्व, हिंदू राष्ट्र, राष्ट्र उभारणी, शिक्षण, इतिहास, अस्पृश्यता निर्मूलन, वैज्ञानीक दृष्टीकोन, भाषा शुद्धी आदी विषयांवरील सावरकरांची सूत्र आजच्या काळातही अनुबंध जोडणारी आहे. राष्ट्र उभारायचे असेल तर त्याचे हिंदवीकरण आणि राष्ट्राचे सैनिकीकरण करा. असा त्यांचा विचार होता. आजही हा विचार कालानुरूप असून पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना सैन्याचे शिक्षण द्यावे असे म्हणतात, तेव्हा त्याला काही शक्तिंचा विरोध होतो. त्यासाठी हिंदूंच्या एकत्रीकरणाची गरज आहे.’
अभ्यंकर म्हणाले, ‘तरुणांचे धेय्य सीमित असेल तर राष्ट्रभक्ती निर्माण होणार नाही. त्यासाठी आपला शिक्षणक‘म, आपली संस्कृती, इतिहास यातून फुलला पाहिजे. आपल्या मातीतून निर्माण झालेल्या शिक्षण प्रणालीतून राष्ट्रप्रेमी नागरीकांची निर्मिती होईल. विद्यार्थ्यांची बुद्धी, प्रज्ञा, स्वकर्म कशासाठी याचा विचार झाला पाहिजे. आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग स्वार्थासाठी न करता स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांच्या प्रमाणे आपले बुद्धिवैभव राष्ट्राच्या उद्धारासाठी पणाला लावणे आवश्यक आहे.’
अभ्यंकर पुढे म्हणाले, ‘मानवता ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. जगात भारत एकमेव राष्ट्र आहे जो विश्वकल्याणाचा विचार करतो. अमेरिका, चीन, रशिया या राष्ट्रांचा विचार जगाला बुडविण्याचा आहे. फक्त भारतच असा देश आहे जिथे ‘वसुधैव कुटुंबकम’ असा विचार केला जातो. अन्य देशात जाऊन धर्मांतर, अत्याचार, लूट असे प्रकार भारतीयांनी कधीच केले नाहीत. हिंदू धर्म मानवतावादी आहे. त्यामुळेच जगात कितीही बुद्धिवादी असले तरी त्यांना हिंदुत्वाकडेच वळावे लागेल.’
प्राचार्य येवले म्हणाले, ‘इंग्रंजांनी आपल्याला परकीयांचा इतिहास शिकविला. आपल्या देशाचा स्फूर्तिदायी इतिहास इंग्रंजांनी सांगितला नाही. त्यामुळे देशाभिमानाचा संस्कार करण्यात आपण कमी पडलो. ज्वाज्वल्याने खचाखच भरलेला आपला इतिहास शाळा महाविद्यालयातून शिकविण्याची गरज आहे.’
कुंटे म्हणाले, ‘सावरकरांचे संपूर्ण जीवन मातृभूमीशी एकरूप झाले होते. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी मांडलेली विचारसूत्रे आजच्या परिस्थितीतही तंतोतंत जुळतात. अशा 225 सूत्रांचे आजच्या संदर्भातील स्पष्टीकरण या ग्रंथात करण्यात आले आहे. सावरकरांच्या विषयांची श्रद्धा खोलवर आहे. देशातील समस्या सोडविण्यासाठी राष्ट्र जीवनाचे हिंदूकरण झाले पाहिजे. आपली संस्कृती, परंपरा, इतिहास, ग्रंथ आणि समाजाच्या रक्षणासाठी हिंदूंनी जागरुक रहावे.’ प्राध्यापक आनंद काटिकर यांनी सूत्रसंचालन केले