‘ मिरी निर्यातीची कोकणातील शेतकऱ्यांना चांगली संधी ‘
‘ग्लोबल कोकण फेस्टिव्हल’ मधील परिसंवादाचा सूर
पुणे :’जगात फक्त ५ देशात काळी मिरीचे उत्पादन होत असल्याने कोकणवासीयांना काळी मिरी लागवडीतून निर्यातीची चांगली संधी आहे त्यातून कोकणातील शेतकऱ्याला आर्थिक समृद्धी मिळवता येईल ‘ असा सूर ग्लोबल कोकण फेस्टिव्हल मधील परिसंवादात उमटला .
‘आधुनिक शेती ;कोकणचे वैभव ‘ या परिसंवादात हा सूर उमटला . फलोत्पादन तज्ज्ञ विजय जोगळेकर ,कृषी तज्ज्ञ प्रभाकर सावे , मसाला पिकांचे तज्ज्ञ मिलिंद प्रभू ,कृषी -पणन मंडळाचे अधिकारी भास्कर पाटील ,बी .व्ही .जी . इंडिया कंपनीतील कृषी तज्ज्ञ पी . कोळेकर यांनी या परिसंवादात भाग घेतला .
‘ मेस्से ग्लोबल एक्झिबिशन सेंटर ‘ (लक्ष्मी लॉन , मगरपट्टा सिटी ) येथे कोकण भूमी प्रतिष्ठान आणि एक्झीकाँन ग्रुप आयोजित ‘ ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘ अंतर्गत हा परिसंवाद शुक्रवारी सायंकाळी झाला . हा फेस्टिवल १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणार आहे .
मसाला पीक तज्ज्ञ मिलिंद प्रभू म्हणाले ,’काळी मिरी जितकी पिकवू तितकी विकली जाते . कोकणात फार्मा कंपन्या त्या विकत घेतात आणि निर्यात करतात . काजू आणि काळी मिरी एकत्र घेतली तर दुप्पट फायदा होतो . ‘
‘शेती पाहणे हाही पर्यटनाचा विषय झाल्याने पर्यटकांना शेती कशी होत असते ,हे पाहण्याचे कुतूहल असते . त्यामुळे शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेती प्रयोग केल्यास कृषी आणि पर्यटन विषयक असे दोन्ही प्रकारचे लाभ होऊ शकतात ‘,असे मत प्रभाकर सावे यांनी व्यक्त केले .
विजय जोगळेकर म्हणाले ,’ वनस्पती शास्त्राची ओळख असेल तर फळबागायतीमधून चांगला फायदा होतो . या शास्त्राची जाण वाढवणे आवश्यक आहे . फलोत्पादनासाठी ठीबक सिंचन पद्धती महत्वाची असून सिंचनाचा विचार करताना पाणी बचतीपेक्षा अन्नद्रव्ये मुळाशी शंभर टक्के पोचतील यावर भर द्यावा ‘
ग्लोबल कोकण फेस्टिव्हल ‘चे संयोजक संजय यादवराव ,एम . क्यू .सय्यद ,किशोर धारिया यांनी स्वागत केले .