मुंबई- ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, त्यांना भगव्याला हात लावण्याचा काहीच अधिकार नाही असा घणाघात भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांवर केला. तसेच, एका झेंड्याचा दांडा पकडायला तुमच्याकडे माणसं नाहीत, तुमचा झेंडा कोण खांद्यावर घेणार असा सवालही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेला भगवा झेंडाही फडकणार आहे. घड्याळ चिन्हाच्या झेंड्यासोबत भगवाही फडकवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीतल्या पाथरीमध्ये आयोजित शिवस्वराज्य यात्रेत केली आहे. त्याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली.
तावडे म्हणाले, “अजितदादा तुमच्याकडे एक झेंडा आहे, त्याचा दंडा पकडायला माणसं नाहीत. तो झेंडा कोण घेणार खांद्यावर? तुमच्या पक्षाचे लोक सोडून चालली आहेत, मग झेंडा-झेंडा काय करता? छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा घेऊन चालत नाही तर शिवाजी महाराजांनी जे शिकवले आहे ते अंमलात आणणार आहोत का? रयतेला न लुटता रयतेला घडवणे हे महाराजांनी केले. आपल्या काळात किती घोटाळे झाले, आपण रयतेच आपण काय केले हे विसरू नका. झेंडा मानाने, प्रेमाने, खंबीरपणे त्याचा दंडा पकडणारा कार्यकर्ता हा उभा राहिला पाहिजे. जो तुमच्या सगळ्या नेत्यांना बघून पळत सुटला आहे आणि नेतेही पळत सुटले आहेत.”