सोलापूर -श्री राम जन्मभूमी अयोध्येत राम मंदिराचे काम ऑगस्टमध्ये सुरू होत आहे. यासाठी येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपुजन पार पडणार आहे. या भूमिपूजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ‘कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचे, हे आधी ठरवायला हवे. आम्हाला कोरोना संपवला पाहिजे असे वाटते आणि काही लोकांना मंदिर बांधून कोरोना जाईल, असे वाटते’, असा पवारांनी लावला आहे. पवार आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हेदेखील उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘सध्या देशासमोर करोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे आधी ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचे संकट दूर होईल, असे काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे,’ असा टोला पवारांनी नरेंद्र मोदींना लगावला.
पवार पुढे म्हणाले की, ‘कोरोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातून लोकांना कसे बाहेर काढायचे, याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून कोरोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा. राज्य आणि केंद्र सरकारने कोरोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिले पाहिजे. याबाबत आमचे खासदार दिल्लीत प्रश्न मांडतील’, असेही पवारांनी म्हटले.