सोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी 40 हजार कोटींपर्यंत महसूल देणारी नवरत्ने आहेत. त्यात ऑईल कंपन्या, विमानतळे, रेल्वे यांचा समावेश आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळेच विकल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला. दारुड्या जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, असा प्रकार मोदींकडून सुरु असून ते पंतप्रधान नसून दारुड्या असल्याची टिकाही ऍड. आंबेडकरांनी यावेळी केली.
माजी मुख्यमंत्र्यांना सत्ता गेल्याचा पडलाय विसर
राज्याचे माजी मुख्यमंत्री असे कोणतेही घटनात्मक पद नसून देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्याचा विसर पडला आहे.त्यामुळे त्यांनी आता तर जमिनीवर येऊन विरोधकाची भूमिका बजावावी, असा सल्लाही ऍड. प्रकाश आंबेडकरांनी दिला. उपमुख्यमंत्री हेही पद घटनात्मक नाही. अर्थमंत्र्यांनी कोणते तरी कारण पुढे करुन कारखानदारांना मदत द्यायची आणि नुकसानग्रस्तांना मदत न देण्याची भूमिका बदलावी, असा टोलाही लगावला. कारखानदारांना थकहमी देण्यासाठी तीन पायाच्या सरकारमधील दोन पाय एका पायावर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, उसतोड कामगारांसोबतचा करार संपला असून आता नवा करार करण्याच्या निमित्ताने 25 ऑक्टोबरला विशेष परिषद आयोजित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अक्कलकोट तालुक्याची पाहणी करण्यासाठी ऍड. आंबेडकर आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी सरकारकडे केली. खावटी योजनेअंतर्गत नुकसानग्रस्तांना प्रत्येकी पाच हजारांची मदत द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ठरावीक जिल्ह्यातील काही भागांचीच पाहणी करण्यापेक्षा सर्वच नुकसानग्रस्त भागांचा दौरा करावा. जेणेकरुन त्यांना दिलासा मिळेल आणि सरकार आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास निर्माण होईल. तसेच पुराच्या पाण्याने धान्य, कपडे खराब झाल्याने त्यांना अनुदानाच्या स्वरुपात धान्य, भांडी, कपड्यांचीही मदत करावी, अशीही आपली मागणी असल्याचे ऍड. आंबेडकरांनी सांगितले