पुणे- कोरोना महामारीने भारत देशासह संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना आता पुढे काय होणार या चिंतेत सर्व भारतीय नागरिक होते. मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांमध्येच भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 वाजता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतिहास घडविणारी घोषणा केली. आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा करताना पंतप्रधानांनी त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे ऐतिहासिक पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय ‘न भूतो न भविष्यती’ असा असल्याचे राज्यसभेचे माजी खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी म्हटले असून याबद्दल पंतप्रधान मोदी यांना संजय काकडे यांनी कोटी कोटी धन्यवाद दिले आहेत.
संजय काकडे म्हणाले की, महाराष्ट्राचा वार्षिक महसूल 2 लाख कोटी रुपये आहे. आत्मनिर्भर भारतासाठी जाहीर केलेले 20 लाख कोटी रुपये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महसूलाच्या दहापट रक्कम. आणि देशाच्या जीडीपी च्या ती दहा टक्के आहे.
सगळीकडे अंधार दाटलेला असताना पंतप्रधान मोदी यांनी विकासाचा प्रखर तेजस्वी दिवा यानिमित्ताने पेटविला आहे. देशातील युवा पिढी व उद्योग क्षेत्राला एकविसाव्या शतकातील आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले. या आत्मनिर्भर भारताच्या नवनिर्माणासाठी पंतप्रधान मोदी यांनी 2014 पासूनच अर्थव्यवस्था, प्रशासन आदी अनेक पातळीवर सकारात्मक बदल घडवून आणण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. त्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी त्यांच्या कालच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केला. आणि यापुढेही हे सकारात्मक बदल सुरू राहतील असेही स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत शेतकरी, मोल मजुरी करणारे गोरगरीब ते नोकरदार व मध्यमवर्गीय, पर्यटन, उत्पादन क्षेत्र, प्रक्रिया उद्योग, गृह उद्योग आणि इतर सर्वच लहान, मध्यम उद्योग ते मोठमोठ्या उद्योग क्षेत्राला सामावून घेण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक मंदीतून आपला देश यामुळे सही सलामत बाहेर येण्यास मदत होईल. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे जगाच्या बाजारपेठेत भारताचे स्थान अधिक मजबूत होईल. ही आत्मनिर्भर भारतासाठीची योजना म्हणजे भारताला, आपल्या देशाला महासत्ता बनविण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेले अतिशय मजबूत व आश्वासक पाऊल आहे, असेही माजी खासदार संजय काकडे यांनी सांगितले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीविषयी देशाच्या अर्थमंत्र्यांमार्फत आजच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
देशातील उद्योजक, विविध क्षेत्रातील जाणकार ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वजणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेचे विशेष कौतुक वाटत आहे. कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ झटकून आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता प्रत्येकाने सज्ज व्हावे, कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहनही माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.