शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीतला निर्णय, थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर जाणार
मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद अशा पद्धतीने एकाएकी सोडण्याचा अधिकार साहेब तुम्हालाही नाही. हवे असल्यास आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्या. मात्र, प्रमुख पदावरून बाजूला होऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध केला आहे.शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यांच्या या निर्णयामुळे जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी बड्या नेत्यांसह सर्वच लहान मोठे अचंबित झाले. सर्वजण पवारांना हा निर्णय रद्द करण्याची मागणी करू लागले. जयंत पाटलांसह अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. पण पवारांनी हा निर्णय काही अचानक घेतला नाही. त्यांनी नुकतेच भाकरी फिरवण्याचे विधान करून याचे संकेत दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरकार्यक्रमातच तीव्र विरोध केला आहे. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही. असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
यावेळी आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना अश्रू अनावर झाले. अक्षरश: रडत रडत जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी वाटल्यास आम्हा सर्व नेत्यांचे राजीनामे घ्यावे. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यावा. मात्र, त्यांनी प्रमुख पदावरून बाजुला होण हे राष्ट्राच्या, राज्याच्या हिताचे नाही. आम्हाला शरद पवारांच्या छायेखालीच काम करण्याची सवय आहे.
शरद पवार म्हणाले, शरद पवार यांना अनुभव मोठा आहे. त्यांचा अनुभव आम्हाला अजूनही हवा आहे. आम्ही त्यांच्याकडे बघूनच राजकारण केले. देशाच्या सर्वोच्च ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची जी प्रतिमा आहे, ती केवळ शरद पवारांमुळे आहे. ती सर दुसऱ्या कुणालाही येणार नाही.
राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले – शरद पवारांनी आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करावा. पवार म्हणतील तेच पक्षात होईल. पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच आहेत. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आपले अश्रू आवरत म्हणाले – पवारांनी थेट राजीनामा देण्याची गरज नव्हती. पवारांशिवाय आम्ही जनतेपुढे कसे जाणार? त्यांच्या या भूमिकेनंतर अजित पवारांनीही शरद पवारांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली.
दरम्यान, शरद पवारांच्या एका निर्णयामुळे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस एकजूट झाल्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच चर्चा सुरू आहे.