मीरारोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे झाले भूमिपूजन
मुंबई दि. 20 – पहाटे पासून रात्रीपर्यंत १८-१८ तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे. समाजाच्या उध्दारासाठी, कल्याणासाठी आयुष्यभर त्यांनी ऐतिहासिक असे काम केले. त्यांच्या नावाने २७ कोटी रुपये खर्च करून मीरा भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभे राहत आहे ही अत्यंत मोठी व महत्वाची , आनंद देणारी अशी गोष्ट आहे. सर्व सुविधांनी सज्ज असे हे भवन येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंग बाबतचे व स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण दिले जावे , असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी मीरारोड येथे केले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नांनी साकार होत असलेल्या मीरा भाईंदर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. जवळपास ६० ते ६५ कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या हटकेश परिसरातील जवळपास १ एकर मोक्याच्या जागेवर हे भवन होणार असून तीन मजली सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये कार्य होण्यासाठी मोठा हॉल , विपश्यना हॉल , प्रदर्शन हॉल , ग्रंथालय , मिनी थिएटर , कॉन्फरन्स रूम , कॅफे एरिया , लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. राज्यातील आंबेडकरी चळवळीतील नेते-कार्यकर्ते जर मीरा भाईंदर शहरात आले तर त्यांच्या विश्रामाची व्यवस्थाही भवनात केली जाईल. त्यासाठी ४ चांगल्या रूम भवनात असतील. त्याचप्रमाणे या आंबेडकर भवनाच्या प्रांगणात १५ ते २० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची नागरिकांची मागणीही आमदार प्रताप सरनाईक यांनी मान्य करत आपण त्यासाठी परवानगी आणू पण हा पुतळा तेथे उभारला गेला पाहिजे , असे कार्यक्रमात घोषित केले. याच सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी केंद्रही सुरु केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये शिकण्यासाठी गेले होते व लंडन मधील ज्या घरात बाबासाहेब राहिले होते, त्या लंडनच्या घराप्रमाणेच मीरा भाईंदरच्या या सांस्कृतिक भवनाची इमारत उभारली जाणार आहे. लंडनमध्ये बाबासाहेब १९२२ मध्ये शिकण्यासाठी गेले होते. २०२२ मध्ये त्याला १०० वर्षे होत असताना त्या लंडनच्या घराप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इमारत उभारली जाईल. लंडनच्या घराप्रमाणे ही मीरा भाईंदरमध्ये उभी राहणारी भवन इमारत आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अफाट ज्ञान , त्यांनी केलेले कार्य , त्यांची शिकवण आपल्याला आठवण करून देत राहील , हे भवन राज्यात पहिल्यांदा उभे राहत आहे असे आमदार सरनाईक म्हणाले.
यावेळी मंत्री रामदास आठवले म्हणाले की , २७ कोटी रुपये खर्च करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भवन उभे राहत आहे ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. २७ कोटी इमारतीवरील खर्च व ६० कोटींची जमीन त्यामुळे हा प्रकल्प १०० कोटींचा भव्य झाला आहे. या सांस्कृतिक भवनात ग्रंथालय, मंगल कार्यालय , विपश्यना केंद्र याबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र होत आहे. त्याचबरोबरीने बँकेत नोकरी मिळविण्यासाठी काय करायचे त्याचेही प्रशिक्षण द्या. आपले तरुण बँक तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये कामाला लागले पाहिजेत , असे ते म्हणाले.
मै आया हू जीस शहर के अंदर उसका नाम है मीरा भयंदर अशी कविता सादर करीत ना.रामदास आठवले यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेल्या भाषणाने कार्यक्रमात उपस्थित मीरा भाईंदर मधील नागरिकांमध्ये उत्साह संचारला होता.
प्रताप सरनाईक यांचे नेतृत्व डॅशिंग आहे. त्यांचे काम चांगले आहे व काम पाहून मला आनंद वाटला. त्यांच्या प्रयत्नातून जवळपास ४० ते ४२ हजार फूट बांधकाम असलेले इतके चांगले भवन इथे होत आहे. ते पुन्हा आमदार होतील. आणि लवकरच सरनाईक यांना मंत्री पद मिळावे अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील स्ट्रॉंग असे आमदार प्रताप सरनाईक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की तुमचा मंत्रिपदासाठी विचार करतील असे सांगत आठवले यांनी सरनाईक यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वात आधी शिवसेना पक्षप्रमुखाना पत्र लिहून महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा आग्रह पत्रातून धरला होता. त्या आमदार सरनाईक यांच्या पत्राचा उल्लेख आठवले यांनी प्रारंभी भाषणात केला. आज जे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आहे ते सरकार आणण्यात सर्वात मोठा वाटा सरनाईक यांचा आहे असे रामदास आठवले म्हणाले व त्यांनी शिवशक्ती – भीमशक्ती युती कशी झाली त्याची आठवणही सांगितली. यावेळी प्रताप सरनाईक व रामदास आठवले या दोघांनीही आपल्या चारोळ्या , कविता सादर करून टाळ्या मिळवल्या. मीरा भाईंदर मधील शेकडो नागरिकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र शेलेकर; माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे; निर्मला सावळे; नीला सोंस;रिपाइं मुंबई युवक अध्यक्ष रमेश गायकवाड; चंद्रमानी मनवर; अनंत शिर्के; नगरसेवक , पालिका अधिकारी उपस्थित होते.
गायक नंदेश उमप यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम यावेळी झाला. नंदेश उमप यांच्या एका गाण्यावर तर उपस्थित लोक अक्षरशः ५ मिनिटे नाचत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अशी भव्य वास्तू शहरात उभी राहत आहे याचा आनंद उपस्थित शेकडो नागरिकांनी व्यक्त केला.