नागपूर-मराठा आरक्षणावर आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ते नागपूरमध्ये बोलत होते.आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा विरोधकांवर टीका करताना तोल सुटला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चापासून ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका त्यांना सहन करावी लागतेय. आता राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय.
काय म्हणाले सावंत?
सावंत म्हणाले की, सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे. याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे. पण, मराठा आरक्षणाचा विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे.
काय म्हणाले विखे-पाटील?
मंत्रिमंडळातील सहकारी डॉ. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मात्र, त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल, तर ते दुर्दैवी आहे. मला वाटतं जबाबदार लोकांनी अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे, अशी माझी त्यांना विनंती आहे.
आघाडीमुळे आरक्षण गेले
विखे-पाटील पुढे म्हणाले की, देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री असताना एवढे मोर्चे निघाले. मात्र, आपण आरक्षण टिकवले. हे आरक्षण महाविकास आघाडीमुळे गेले. समाजबांधवांनी संयम पाळावा. आता उपसमिती करण्यात आलीय. ती सर्वांच्या भावनांना अंतर्भुत करेल. सर्वांना न्याय देईल.
सावंतांचा मााफीनामा
वादग्रस्त वक्तव्यावर टीका होताना पाहून अखेर मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माफी मागितली आहे. सावंत म्हणाले की, समाजातील पाळण्यातील मुलांपासून आजोबा पणजोबापर्यंत सर्वांची मी जाहीर माफी मागतो आहे. केवळ माफी मागून मी स्वस्थ बसणार नाही तर, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी अविरत प्रयत्न करत राहणार आहे.
ओघात बोललो
सावंत म्हणाले की,आमचा समाज मागासलेला आहे. जवळपास तासभर मी त्या कार्यक्रमात बोललो आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करणारा माणूस मंत्रिपदावर आहे. हे आरक्षण घेतल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत मराठा आरक्षण मिळाले नाही. तर मी राजीनामा देईल. या भाषेत मी बोललो आहे. ग्रामीण भाषेत ओघवत्या शैलीत मी बोलून गेलो आहे. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.