मुंबई दि. २३ फेब्रुवारी – वन मंत्री संजय राठोड यांनी पीडित पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं, मात्र, पूजाचा मृत्यू कसा झाला, वायरल क्लिपची सत्यता काय, याबाबत काहीही भाष्य केलं नाही, सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला,” अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
यावेळी प्रविण दरेकर म्हणाले की, तब्बल १५ दिवस अज्ञातवासात असलेले वन मंत्री संजय राठोड आज जनतेसमोर प्रकट झाले. पोहरादेवीचे दर्शन घेऊन प्रसार माध्यमांसमोर प्रायश्चित्त करतील, राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील, अशी अपेक्षा होती. पण “सत्ता”च यातून सोडवू शकेल, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही. राठोडांनी पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला, याबाबत भाष्य केलं नाही, फक्त मीडियासमोर येण्याचं नाटक केलं, समाजाचा दबाव निर्माण करुन प्रसारमाध्यमांनाच दोष दिला आणि सत्य लपवून ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
प्रविण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचीही यावेळी आठवण करुन देत असताना ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले. तसेच “मुख्यमंत्र्यांनी जनतेला आदेश दिले आहेत की, मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका. आम्ही विरोधी पक्ष असलो तरी या आदेशाचे पालन करीत आहोत. पण आज पोहरादेवी येथे करोनाची कोणतीही काळजी न घेता शक्तिप्रदर्शन केले गेले, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले गेले, जिल्हा प्रशासन म्हणून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.
“राज्यातील महिला, मुलींच्या मनात याविषयी काय यातना होत असतील, याची जाणीव सरकारला व्हावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत राज्यातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडत आहेत की काय, असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला.