नार्वेकरांच्या फोनवरुन एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा; भाजपसोबत सत्ता स्थापन करा- शिंदेंची प्रमुख अट
शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. शिंदे यांनी 30 आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि 14 अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी 3 मंत्री असून एकूण 30 आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.
राज्यातील काँग्रेसही अलर्ट मोडवर असून त्यांचेही आमदार फुटण्याची भिती व्यक्त होत आहे. याच धर्तीवर काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. तर वर्षा बंगल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. दुसरीकडे मातोश्रीवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?
- एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
- मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
भाजपशी युती करा- शिंदेंची अट
एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपसोबत युती करण्याची अट ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसायचे असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे या तीन आमदारांनाही मातोश्रीवर पाठवले आहे. या बैठकीत काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.
आमदारांसह शिंदे दिल्लीला जाणार?
सुरतमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांबाबत दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रथम- त्यांना विमानाने दिल्लीला नेले जाऊ शकते आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेले जाऊ शकते. दुसरे- त्यांना अहमदाबादमधील कोणत्याही रिसॉर्टमध्ये नेले जाऊ शकते.
मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुरतला पाठवले आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार रवी पाठक हेही सुरत येथील ली-मेरीडीअन या हॉटेलमध्ये गेले. त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 1 तास 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत ठोस निर्णय काय झाला हे मात्र समजू शकले नाही
एकनाथ शिंदेंच्या या आहेत अटी
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती करा
- काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोडावे त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले
- मीच गटनेता राहणार
उद्धवजी आपण उपमुख्यमंत्री व्हा
एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.
शिंदे अन् देशमुखांमध्ये खडाजंगी
नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये 30 हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदारांना हलवणार
सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते.
कोणते आमदार नॉटरिचेबल?
1. शहाजी बापू पाटील
2. महेश शिंदे सातारा
3. भरत गोगावले
4. महेंद्र दळवी
5. महेश थोरवे
6. विश्वनाथ भोईर
7. संजय राठोड
8. संदीपान भुमरे
9. संजय शिरसाठ
10. रमेश बोरणारे
11. प्रदीप जैस्वाल
12. अब्दुल सत्तार
13. तानाजी सावंत
14. सुहास कांदे
विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे.
पक्षांतर बंदी कायदा
विधानसभेत शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण 29 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.