मुंबई-”मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत” असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज एका खासगी कार्यक्रमात बोलताना केले.पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्यानिमित्त अंबाजोगाई (जि. बीड) येथे आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडेंची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे.
नेमक्या काय म्हणाल्या पंकजा?
पंकजा मुंडे म्हणाल्या, मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी पण वंशवादाचे प्रतीक आहे. मला कुणी संपवू शकत नाही. मी जर जनतेच्या मनावर राज्य केले आणि जनतेच्या जीवनासाठी चांगले कार्य केले तर मला मोदीही संपवू शकणार नाहीत. आपल्याला आता राजकारणात बदल करण्याची गरज आहे.
“आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेशमंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.