मुंबई- विधान परिषदेसाठीचे दुपारी पावणेचार वाजेपर्यंत 285 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अखेर 2 तासानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या आक्षेपामुळे मतमोजणी रखडली होती. केंद्रीय निवडणूक आयोगानेही काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत.खरंतर, भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप सध्या आजारी आहेत. मुक्ता टिळक यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. दोघंही आजारी असताना आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आले होते. पण यावेळी त्यांनी स्वत: मतदान न करता दुसऱ्यांकडून मतदान करून घेतलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून याची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. पण केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.
पडणार कोण ? याबाबत उत्सुकता …
विविध पक्षांचे उमेदवार खालीलप्रमाणे –
भाजपा – राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड
शिवसेना – आमश्या पाडवी, सचिन अहिर
राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे
काँग्रेस – चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप