पुणे दि. 5- पिण्याचे पाणी शुद्ध असणे आवश्यक असल्याने पिण्यासाठी सर्वांना शुद्ध पाणी पुरविणे हे कर्तव्य असून त्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन जलसंपादन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पर्वती येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी अशुद्ध असल्याने विविध रोग होत आहेत. पुण्यासारख्या शहरात असा अत्याधुनिक जलसुध्दीकरण प्रकल्प झाल्याने नागरिकांना शुध्द पाणी मिळेल आणि नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहील. या प्रकल्पामुळे पाण्याची होणारी गळती देखील कमी झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाण्याच्या एकुण वापरापेक्षा गळतीचे प्रमाण अधिक असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पुणे शहरात देखील लवकरच पाणी वापराचे मुल्यमापन करुन पाणी गळती पुर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न करता येतील. शहरातील जलसंपदा विभागाशी निगडीत प्रश्नांसाठी लवकरच बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येतील.
यावेळी श्री. महाजन यांनी जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या फलकाचे तसेच रिमोट कंट्रोलव्दारे जलशुध्दीकरण प्रकल्पाचे अनावरण केले. यावेळी प्रकल्पासाठी उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मुक्ता टिळक यांनी केले तर आभार उपमहापौर सिध्दार्थ झेंडे यांनी मानले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, खासदार अनिल शिरोळे यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.