मुंबई दि.२६ एप्रिल :- कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाउन करण्यात आले आहे. नेमके यातच आयआयटी जेईई आणि नीट प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी गेलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी कोटा येथे अडकून पडले आहेत. खानावळ बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होत आहेत.या विद्यार्थ्यांची खाण्याची योग्य सोय नाही.त्यांची गैरसोय होत आहे. तेथील खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत, ऑनलाइन क्लासही होत नाहीत. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत कोटा येथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.
राजस्थानी येथील कोटा हे १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः वैद्यकीय व इंजिनिअरिंग क्षेत्रात भवितव्य करू पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र बनले आहे. सद्य स्थितीत महाराष्ट्रातील तीन हजार मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी तिथे वास्तव्य करीत आहेत. लॉकडाउनमुळे ही मुले गेल्या दोन महिन्यापासून तेथेच अडकून पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अस्वस्थेतेचे वातावरण असल्याचे श्री.दरेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यातील विद्यार्थी कोटा तेथे शिकण्यासाठी गेले होते. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विद्यार्थ्यांना आणण्यासाठी विशेष वाहनांची व्यवस्था केली. परंतु महाराष्ट्रामध्ये अद्याप अशी व्यवस्था झालेली नाही. एवढेच नव्हे तर जे पालक आपल्या मुला-मुलींना आणण्यास इच्छुक आहेत त्यांनाही पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयातून परवानगी मिळत नसल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कोटा येथे शिकणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी महाराष्ट्रात पुन्हा कसे येतील याबाबत सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी श्री.दरेकर यांनी केली पत्राच्या माध्यमातून केली आहे.