पुणे-“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःसह समाजाचा उत्कर्ष साधला. आपल्या विकासात शिक्षणाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे आजच्या तरुणांनी बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेऊन शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. ‘वाचाल तर वाचाल’ हा मूलमंत्र ध्यानात घेऊन वाचन करत बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायला हवेत” असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ या उपक्रमाअंतर्गत महापुरुषांची १० हजार चरित्र पुस्तके वाटण्यात येणार आहेत. नालंदा विहार, पद्मावती येथे झालेल्या या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी भीमराव तापकीर बोलत होते. यासाठी बनविण्यात आलेल्या ‘छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकर विचाररथा’चे फीत कापून त्यांनी उद्घाटन केले.
याप्रसंगी चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे, आरपीआय नेते महेश शिंदे, स्थानिक नगरसेवक महेश वाबळे, आरपीआयचे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, सचिन गजरमल, पत्रकार नंदकिशोर शहाडे,संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, सल्लागार दत्ता पवार, युवा अध्यक्ष विकास कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मावती, दत्तनगर परिसरातील विद्यार्थ्यांना पुस्तके वाटण्यात आली.
भीमराव तापकीर म्हणाले, “बाबासाहेबांनी दिलेला प्रत्येक विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे. जयंतीदिवशी केवळ डीजेपुढे नाचण्यापेक्षा वाचन करून बाबासाहेब समजून घेतले तर आपला उत्कर्ष होईल. त्यामुळे अधिकाधिक युवकांनी महापुरुषांची चरित्रे वाचून त्यांचे विचार दैनंदिन जीवनात अंमलात आणावेत”
शशिकांत कांबळे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावशाली विचारांतून प्रेरणा घेऊन युवापिढी घडली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र घेऊन त्यांना अभिप्रेत समाजाची निर्मिती व्हायला हवी. याच विचारांतून यंदाच्या जयंतीनिमित्त ‘नाचून मोठे होण्यापेक्षा वाचून मोठे होऊया’ हा संकल्प आम्ही सोडला आहे.”
हा ‘छत्रपती-शाहू-फुले-आंबेडकर विचाररथ’ पुण्यातील विविध दलित वसाहतींमध्ये फिरणार आहे. यामध्ये दत्तनगर, पर्वती, कासेवाडी, राजेवाडी, ढोले पाटील रोड, विश्रांतवाडी, बोपोडी, औंध, रामनगर, वारजे, धनकवडी, पद्मावती, मंगळवार पेठ, कामगार पुतळा आदी ठिकाणांचा समावेश आहे. या रथाद्वारे पुस्तक वाटपासह जनजागृती केली जाणार आहे. प्रा. फुलचंद चाटे यांनीयावेळी आपले मनोगत व्यक्त केले .