नवी दिल्ली-उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अवयव दानाबाबत लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करून या अत्यंत महत्वाच्या मुद्याबाबत धार्मिक नेते आणि माध्यमांनी जागृती निर्माण करावी आणि त्या द्वारे लोकांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.
दधिची देहदान समितीतर्फे आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शरीर अवयव दानासंदर्भात राष्ट्रीय अभियानाच्या प्रसंगी उपस्थित मेळाव्यास ते संबोधित करत होते. उपराष्ट्रपतींनी अवयव दान हा अत्यंत संवेदनशील मुददा असून अवयव दानासाठी एक आधारभूत व्यवस्था तयार करण्याच्या आवश्यकते वर जोर दिला. या संदर्भात दधिची देहदान समितीने अत्यंत योग्य अशी परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रशंसा करून त्यांनी हे प्रयत्न कौटुंबिक स्तरापर्यंत पोहचले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या अभियानात माध्यमे आणि समाजमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या चांगल्या अर्थाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक माध्यमातील व्यक्तीने योगदान दिले पाहिजे, असे त्यांनी पुढे सांगितले.
महर्षी दधिची जयंतीदिनाच्या निमित्ताने आपल्या शुभेच्छा देताना धनखड यांनी आपल्या स्वतःच्या आनंदासाठी आणि समाजाला त्याचे देणे परत करण्यासाठी या महान ऋषीचे जीवन आणि तत्वज्ञान अनुसरावे, असेही आवाहन धनखड यांनी केले.
याप्रसंगी, सकारात्मकता से संकल्प विजय का या नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन ऋषीकेश येथील परमार्थ निकेतच्या साध्वी भगवती सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशन झाल्यावर पूज्य साध्वीजींनी पुस्तकाची पहिली प्रत उपराष्ट्रपतींना सादर केली.
खासदार डॉ. हर्षवर्धन, खासदार सुशील मोदी, वरिष्ठ विधीज्ञ आणि दधिची देहदान समितीचे आश्रयदाते आलोक कुमार, अवयव दात्यांचे कुटुंबीय, 22 राज्यांतील स्वयंसेवी संस्था (एनजीओ), डॉक्टर्स आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.