भाजपा राजवटीत बाबागिरी वाढलीय काय ?
अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आलेत. या बागेश्वर बाबांनी आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.संत तुकारामांना त्यांच्या पत्नी दररोज मारहाण करत होत्या. त्यामुळे त्यांनी देवाचा धावा केला, अशी मुक्ताफळे त्यांनी या व्हिडिओत उधळली आहेत. त्यांच्या या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. तसेच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे.पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या व्हिडिओत म्हणतात – ‘संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांना याविषयी विचारणा केली. तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?, असे तो म्हणाला. त्यावर तुकाराम त्या ग्रहस्थाला म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.’धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, ‘त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा! प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,“बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!”
वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान –
भाजपाच्य अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. “बागेश्वर धाम तथा पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी.”
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानाचा निषेध आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.“धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.