केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांची माहिती
नवी दिल्ली- उत्तर भारतातील पहिला अणूऊर्जा प्रकल्प हरियाणामध्ये, राजधानी दिल्लीपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर, उत्तर दिशेला असलेल्या गोरखपूर शहरात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. या संदर्भात आज माहिती देतांना ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील एक महत्वाची कामगिरी म्हणजे, देशाच्या इतर भागातही अणूऊर्जेचे प्रकल्प उभारले जात आहेत. पूर्वी हे प्रकल्प केवळ देशाच्या दक्षिण भागातच म्हणजे तामिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा पश्चिमेत महाराष्ट्रात होत असत, मात्र आता ते इतर भागातही होणार आहेत.
भारताच्या आण्विक ऊर्जा क्षमता वाढवण्याची क्षमता वाढवण्याच्या आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमानुसारच हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने, गेल्या आठ वर्षात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. 10 अणूभट्टया स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने सामूहिक मंजुऱ्या दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सरकारच्या अणूऊर्जा विभागालाही अणुउर्जा प्रकल्प उभारण्यासाठी स्त्रोतांकरिता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत संयुक्त प्रकल्प उभारण्याबद्दल मंजूरी देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देशाची भविष्यातील ऊर्जाविषयक गरज भागवण्याची क्षमता असून, हे भविष्यातील एक उत्तम आणि आशादायी क्षेत्र आहे, असे ते पुढे म्हणाले.
गोरखपूर हरियाणा अणू विद्युत प्रकल्पाची (GHAVP) क्षमता, प्रत्येकी 700 मेगावॉटचे दोन युनिट्स इतकी असणार आहे. त्यासाठी भारतीय बनावटीचे, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) बनवण्याचे काम हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात गोरखपूर गावात सुरू आहे. आतापर्यंत यासाठीच्या एकूण 20,594 कोटी रुपये ह्या मंजूर निधीपैकी 4,906 कोटी रुपये निधी खर्च (आजवरची एकूण वित्तीय प्रगती 23.8% इतकी) करण्यात आला आहे.