बेंगलोर- एकीकडे पत्रकार परिषदांना सामोरे जाण्यास घाबरणारे ,मात्र दुसरीकडे जगभर फुशारकीचा दिंडोरा पिटवत अलिशान सफर करणारे पीएम अशी प्रतिमा तर दुसरीकडे प्रत्यक्षात महागाईने त्रस्त , बेरोजगारीने त्रस्त झालेल्या जनतेला कडव्या हिंदुत्वाचे डोस देऊन जातीयवादा कडे झुकविणारे प्रचारक चित्रपट आणि अन्य कृतीशील कार्यक्रम अशा बाबी भाजपच्या अंगावर येत असल्याचे दिसते आहे . तर कॉंग्रेसला मात्र राहुल आणि प्रियांका या बहिण भावाने सुरु केलेले प्रयत्न तारक ठरत असल्याचे दिसते आहे .आम जनतेवर , स्त्रियांवर बलाढ्य वर्गाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारी आक्रमक प्रियांका काही वर्षात जनतेने पाहिली तर रस्त्यावर घरोघरी, प्रवासात जन सामन्यात मिसळून त्यांच्याशी टीव्ही वरून नाही तर थेट संवाद करणारा राहुल जनतेने पहिला .या सर्व बाबीं निकालात प्रतिबिंबित होत असल्याचे दिसून येते आहे.
कर्नाटक निवडणुकीत भाजपने पूर्ण ताकद लावूनही त्यांना यावेळी काँग्रेसवर मात करता आलेली नाही . डबल इंजिन सरकारचे फायदे प्रत्येक ठिकाणी सांगण्याऐवजी पीएम मोदींना शिवीगाळ हा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोही चालला नाही म्हणून बजरंगबलींना प्रचाराचा भाग बनवण्यात आले. मात्र, शनिवारी मतमोजणी सुरू असताना भाजपचे सारे आडाखे कोलमडलेले दिसून येत आहेत. काँग्रेसची बहुमताकडे वेगाने वाटचाल होताना दिसत आहे. 224 च्या विधानसभेत बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे. शनिवारी सकाळपासून काँग्रेसच्या जागा बहुमताच्या पुढे गेल्याचे हाती आलेल्या कलांवरून दिसत आहेत.
कर्नाटक निवडणुकीची तयारी भाजपने खूप आधीपासून सुरू केली होती. हिजाबचा वाद कर्नाटकातून सुरू झाला. बजरंग दल आणि विहिंप यांसारख्या संघटनांनी हिजाबबाबत तीव्र भूमिका घेतली. त्यानंतर तो देशभरात पसरला. हिजाबचा वाद हिंदू मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करेल, असे भाजपला वाटत होते. मात्र, तसे होताना दिसून आले नाही. निवडणुकीपूर्वी बसवराज बोम्मई यांच्या सरकारने मुस्लिमांना दिलेले 4 टक्के आरक्षण रद्द केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. मात्र, निकाल पाहता भाजपच्या या खेळीचाही काही उपयोग झाला आहे, असे वाटत नाही.